Wednesday, 21 November 2018

समीरा

समीरा -
-   -   -  -   -   -   -
..दाऊद आणि कंपनी 1985 ला भारतातून पळाली आणि दुबई प्रकाशझोतात आली...90 च्या दशकात मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे पडसाद दुबईत उमटू लागले होते...त्याकाळात पत्रकारीतेत नवोदीत असल्यानं तिकडची माहिती मिळताना खूप अडचणी यायच्या..फारसं कोण परिचयाचं नव्हतं..संपर्काची साधनं मर्यादीत होती...पण एकदा समीराशी ओळख झाली अन माझा तिथला प्रश्न कायमचा सुटला...
...समीरा ही दुबईतली बुद्धीमान वकील...कायद्याचा अक्षरश: किस काढून तिने कित्येक कठीण केसेस मोठ्या कौशल्याने जिंकल्यात..दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अनिल परब, छोटा शकील, अबु सालेम यांच्याबरोबरच देशविदेशातील माफीया तिचे अशील..परस्परांशी वैर असलेल्या या सा-या मंडळींनी तिलाच वकीलपत्र देण्याचा निकष एकच... तो म्हणजे तिचा कायद्याचा खोल अभ्यास, प्रभावी युक्तीवाद आणि पारदर्शी व्यवहार..अरब राष्ट्रांमध्ये वशिलेबाजी आणि तसल्या गोष्टींना थाराच नाही. कायदेही खूप कडक आहेत....त्यामुळं तेथे केसेस लढायला समीरासारख्याच हुशार वकील हव्यात.. तिचं काम सरळ..एका केसचा दुस-याशी संबंध नाही..एका व्यक्तीचा दुस-या व्यक्तीशी संबंध नाही...प्रत्येक केस निराळी...गुन्हेगारींची यारी-दुष्मनी तिच्याकडं नाही चालत..अतिशय करारी आहे ती..आणि कामाला चोख...त्यामुळंच कित्येक बड्या लोकांना एकाचवेळी ती सहजपणे हॅंडल करू शकते..एकाचवेळी ती वकीलीही करते..तिचा कसलातरी रिसर्चही चालू असतो...विदेशांत भ्रमंतीसाठी ती जाते...मनात येईल ते करत राहते...दिल की खुषी मन का राज..असा सगळा कारभार...

      समीरा खातून हे तिचं खरं नाव. जन्म लंडनचा. आई इराणी वडील अफगाणी. वडील मोठे उद्योगपती. आई जैवविज्ञान शास्त्रातील संशोधक...अत्यंत देखणी...मी भेटलोय त्यांना...आई वडिलांच्या  विद्वत्तेचा आणि सौंदर्याचा मिलाफ समीरामध्ये झालाय..साडेपाच फुटांहून अधिक उंची.. अरबी स्त्रियांप्रमाणे सोनेरीसर गोरा वर्ण..भुरकट डोळे...बदामी चेहरा, नाजूक जिवणी.. .अस्सल अरबी सौंदर्याचा उत्कृष्ठ् अविष्कारच जणु...करीना कपूरची एक जाहीरात आहे शॅंपूची...ती लागली की मला नेहमीच समीरा आठवते...तिच्यासारखीच पण तिच्यापेक्षा काकणभर सरस व्यक्तिमत्व आहे समीराचं .. .पंधरा वर्षांपूर्वी एका मित्राने तिची ओळख करून दिली...तेव्हा कामाच्या निमित्तानं ती मुंबईत आली होती...दिवसभर आम्ही बरोबरच होतो....अगदी सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत...खूप माहिती गोळा करायची होती तिला..खूप सफाईने आणि कौशल्याने ती कामे मार्गी लावत होती...समीरा मनमोकळी आहे....प्रत्येक शब्द तोलूनमापूनच बोलणार... नियत स्वच्छ आणि नजर साफ ...त्यामुळं तिच्याकडं वाईट नजरेनं पाहण्याची कुणाची शामत नाही होत..अबुधाबी, दुबई, मस्कत, जेद्दा, शारजा, अजमान, या संयुक्त अरब अमिरातीमधील राज्यांमध्ये तिची कामं चालतातच.. तसे तिचे क्लाएंट जगभर पसरलेत..निरनिराळ्या देशांमध्ये ती त्यासाठी फिरत असते.. निरनिराळ्या देशांच्या कायद्यांचा तिचा चांगला अभ्यास झालायं..मागे गुलशनकुमार खून प्रकरणाचा खटला लंडनच्या न्यायालयात चालला होता..आरोपी असलेल्या संगीतकार नदीमचे भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत जोरदार युक्तीबाद सुरू होते..नदीमचे वकील होते पॉल गार्लीक... भारत सरकारच्यावतिने स्थानिक वकीलांच्या मदतीसाठी उज्वल निकम तिथं गेले होते...त्याचं रोजच्या रोज वार्तांकन मी करायचो...म्हणजे तिकडून दोघांचे फोन आले की...मी क्रॉसचेक करून इथं बातमी लिहायचो....एके दिवशी साहेबांनी विचारलं, अरे तू एवढं देतोयस इतके दिवस...पण काही निष्पन्न होईल का त्यातून??  मलाही तो प्रश्न पडला...संध्याकाळी समीराला फोन केला...तिला त्या केसचं विचारलं...म्हणाली मला मूळ केसच माहित नाही...युक्तिवाद आणि बचाव काय चाललंय ते ही माहिती नाही...मग कसं सांगू??? मी थोडक्यात तिला केसची माहिती दिली....मग म्हणाली ब्रिटीश कायदे पाहून मगच सांगता येईल.....माझी प्रतिक्रिया एक्स्पर्टस कमेंट म्हणून छापणार का?? म्हणत दिलखुलास हसली.. दुस-या दिवशी तिचाच फोन आला...कुछ दम नही हैं केस मे बॉस्स... कुछ नही होगा .....एक्स्ट्राडिशन नही हो सकता....म्हटलं का??  अरे वहां के कानून ही ऐसें है..ज्यादा ह्युमिनीयर....हमारे यहां होता तो एक दिनमें भेज देते...(तेव्हा बहुदा आपला प्रत्यार्पण करार झाला होता युएई शी)..मी खरंच तिच्या नावाने बातमी दिली होती..फोटोसह....महिन्याभरानं केसचा निकाल लागला...नदीमचं प्रत्यार्पण करण्यास लंडन न्यायालयाने नकार तर दिलाच; पण भारत सरकारने त्याला सहा कोटी रुपये भरपाई द्यावी असाही आदेश दिला....समीराचं म्हणणं खरं ठरलं...
                 मागे आपल्याइथे अधूनमधून अफवा उठायच्या..दाऊदला दुबईत पकडलयं...त्याच्या भावाला अनिसला दुबईत पकडलयं..छोटा राजनला विमानतळावर अटक झालीय...असं काहीही....स्थानिक यंत्रणांकडून काही समजलं नाही तर समीराशी फोन ठरलेलाच असतो...ती ही बोलते दिलखुलास....तिचा संबंध नसलेल्या व्यक्तीबाबत अथवा केसबाबत विचारलं तर मधूनच उखडतेही...वो क्लाएंट है क्या मेरा? मेरेपास कोई ऐसा केस आया नही...असं म्हणून उडवून लावते...मग ओळखायचं तिचा मूड बिघडलाय... तासाभरात परत तिचाच फोन येतो... आपण आधी फोनवर तुसडेपणानं बोललो आहोत याचा मागमूसही नसतो...ती ते विसरलेली असते की ते कमावलेलं सरावलेपण आहे हे कळत नाही... खूप आपुलकीच्या, स्नेहाच्या पहिल्या दोन-तीन शब्दांतच ती आपला राग विरघळून टाकते...काय हवं- नको याची चौकशी करते....माहिती देते.. अरब राष्ट्रांमधील मऊसूत, मधाळ खजूर मला आवडतात...समीराने एकदा अक्षरश: करंडाभरून निरनिराळ्या प्रकारचे खजूर तिकडून पाठवले होते..सोबत खजुराच्या वाईनची भलीमोठी बाटली....खरंच प्रॉडक्ट जबरी...मोहाच्या दारूपासून ते  द्राक्षाच्या वाईनपर्यंत खूप चाखल्यात, पण खजुराचं हे पेय वेगळंच ...नुस्तं आठवलं तरी त्या वाईनची चव जिव्हेवर येते....मध्यंतरी एकदा मी गेलो होतो तिकडं...घरची मंडळीही होती बरोबर...तिकडं बरेचजण परीचित आहेत...मराठी मंडळी तर कितीतरी आहेत...समीरालाही सांगितलं होतं येतोय म्हणून... निघायच्या आदल्यादिवशी तिनं माझा सविस्तर दौरा जाणून घेतला....मी तिकडे गेलो तर ही गायब...कुठे तर म्हणे नैरोबीला कामासाठी गेलीये...पण एक केलं होतं...पाच-सहा दिवसांची तिथल्या सा-या वास्तव्याची, खाण्यापिण्याची आमची चोख व्यवस्था केली होती तिनं... खूप माणसं जोडून ठेवलीत तिनं...तिच्या अम्मीला भेटलो...विश्वासच बसेना...समीराची मोठी बहिण वाटाव्या अशा सुंंदर व शालीन दिसत होत्या...त्यांनी आपुलकीनं आदरातिथ्य केलं...तिचे अब्बा तर कबीर बेदीसारखे दिमाखदार पर्सनालिटीचे...खूप मार्दवतेनं विचारपूस केली...मग म्हणाले, समीरा अशीच आहे मनस्वी...स्वच्छंदी....कधीही जाते..कुठेही जाते..तिनं आम्हाला सांगून ठेवलं होतं मेहमाननवाझी करायला...तुम्ही फक्त तिचे नाही..आमचेही पाहुणे आहात....दुबई आणि लगतच्या भागात मुशाफीरी करण्याचीही सारी व्यवस्था समिरानं केली होती.. तिची लायब्ररी पाहिली मी.. कायदा शास्त्रावरील पुस्तके, बहुतेक सारे धर्मग्रंथ..आणि जे कृष्णमूर्तींपासून खलील जिब्रानपर्यंत सर्व काही तिथं होतं...आणि ती पुस्तकं वाचली जात असावीत हे त्या पुस्तकांवरूनही कळत होतं.....केवळ संदर्भासाठी नव्हे, तर आवडीसाठी  समीरानं ही लायब्ररी बनवलेली ..तिच्या शाही पॅलेसमध्ये दिवसा किंवा रात्रीही तासोनतास डुंबणे हा तर तिचा छंदच...टेनीस-बॅडमिंटनचीही आवड..मार्टीना नावरातिलोव्हा आवडीची आणि बोरीस बेकरची ती डायहार्ट फॅन..इराणी चित्रपटांची आवड आणि उत्तम जाण....आणि असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असूनही पाय जमिनीवर...कुठेही गर्व नाही...माज नाही अन मस्तीही नाही...मनसोक्त आयुष्य जगायची जणुकाही सवयच लागून गेलेली....आश्चर्य वाटलं...एक व्यक्ती, एक स्त्री किती बहुआयामी असते ते पाहून...
             आमची पहिली  काही वर्षं बोलण्यात, परस्परांना ओळखण्यात गेली..मग नात्यांत विश्वास निर्माण झाला..औपचारिकता गळून पडली..नात्याचं पावित्र्य कायम राहीलं..विश्वास कायम राहीला..दोस्तीची शान कायम राहीली....क्रिमीनल प्रॅक्टीस सोडून ती गव्हर्मेंट लॉयर म्हणून काम करू लागली..पोलीस गुन्हेगारांना पकडतात, आणि आपण त्यांना सोडवतो या जाणीवेनं ती अस्वस्थ झाली होती...तिला म्हणालो ...अखेर हा ही एक व्यवसायच आहे...तू काय कोर्टात पैसे दाबून वगैरे नाही सोडवत कुणाला...तुझं बौद्धीक सामर्थ्य पणाला लावतेस.. सुरेख युक्तीवाद करतेस...आणि ते पटलं तर कोर्ट गुन्हेगाराला सोडून देतं...अखेर निर्णय करणारं कोर्ट आहे.. तू किंवा सरकारी वकील नाही....पण..तिला पटलच नाही....ती सरकारी वकील बनली...मग म्हणालो..तुझ्यामुळे कुणाला अकारण शिक्षा झाली तर तुला पटेल का? असं होणारच नाही..आणि असं असेल तर मी ती केस लढणारच नाही....पण मुळात आरोपी दोषी आहे कि निर्दोष हे ठरवणारी तू कोण? आणि ते तुला ठरवायचं असेल, तर सरळ आणखी शिकून जज्ज हो ना....खरं कामाचं समाधान मिळेल तुला...आमच्यात असं काही वाक्‌युद्ध झालं की मग ती संभ्रमित व्हायची..चिडायची....मग म्हणायची...तुम फोन मत करना हां आऽऽबिद..तिचं ते आऽऽऽबिद म्हणणं मला बेहद्द आवडायचं....समीरा तू इतकी सुंदर आहेस...हुषार आहेस...घरचं सगळं छान आहे....तू लग्न का करत नाहीस??  माझ्या मनात असूनही न विचारलेला पण तिच्या अम्मीने विचारायला लावलेला प्रश्न मी विचारला...तसा तिचा काही धोका नव्हता...पूर्वी खूप फिस्कारायची..आता परीस्थिती उलट होती...मीचं माझ्या अस्वस्थता तिच्यावर व्यक्त करायचो...ती शांतपण कडकड ऐकून घ्यायची..आणि म्हणायची...हुवा ना....ठिक हैं...आ जाओ इधर...इधर करो तुम जर्नालिझम...मै रोज एक न्यूज दुंगी आपको...तिच्या बोलण्याचा लहेजा आपलासा करणारा.... एक दिवस तिनं सांगितलं...क्या होगा रे शादी नही की तो? ना मैं सोचती हू लोग क्या कहेंगे..ना अम्मी-अब्बा सोचते हैं वैसा.....किसलीए करने की शादी? मुझे बच्चेवगैरेसे लगाव नही हैं...खूप नाव कमवायचंयं...खूप मोठं व्हायचंय....करीयर करायचंय...जगभरातल्या न्यायालयांमधील मोठ्या वकीलांनी मला मानायला हवं....लग्न करून फारसं काय साध्य होणार? झाला तर तोटाच होणार ना ?  ती ते तसं का म्हणाली हे अजूनही कळलं नाही...बहुदा काहीतरी मन दुखलं असावं ऐन तारुण्यात तिचं...मी विषय तिथंच संपवला...
           जुन्या बातम्या वह्यांत चिकटवण्याची पूर्वीपासून सवय आहे मला..जुन्या बातम्या वाचताना मजा येते..आपल्या लिखाणात काही सुधारणा होतेय की नाही हे ही लक्षात येतं...एका वहीत गुलशनकुमार खून खटल्याचे कात्रण होते...त्या बातमीत चौकट केलेली समीराचीही बातमी आणि फोटो....क्षणभर समीराच्‌ डोळ्यांसमोर असल्याचा भास झाला...मग जुनी डायरी शोधली...त्यातली नावं आणि फोन नंबर्स पाहू लागलो...त्यात अॅड. समीराचं नाव आणि नंबर दिसला..पुढे छोटी फुली मारलेली..नेहमीची खूण...दुबई किंवा एकंदरच अरब राष्ट्रांमध्ये तसे अपघातांचे, दुर्घटनांचे प्रमाण अल्प आहे म्हणतात...तिथल्या सिला रेसॉर्टमध्ये मैत्रिणींसमवेत मौजमजा करण्यासाठी गेलेली समीरा स्विमींग टॅंकमध्ये बुडून अल्लाला प्यारी झाली...सात-आठ वर्षं उलटली या घटनेला...विश्वास तेव्हाही बसला नव्हता त्या घटनेवर आणि आजही ते खरं वाटत नाही... आणि आजही तिकडचं काहीही काम असलं तरी चटकन नजरेसमोर येते ती समीराच्‌...खजुराच्या मधाळ वाईनसारख्याच तिच्या स्मृती हृदयाच्या कुपीत कायमच्या बंदिस्त झाल्यात....


No comments:

Post a Comment