Wednesday, 21 November 2018

पन्नो

पन्नो
--------

कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत टोकाचा संघर्ष करणं एवढंच् आपल्या हातात असतं..आणि खरंतर एका विशिष्ठ प्रयत्नांनंतर आपण फारसं काय करू शकत नसतो..या संघर्षात कधी आर्थिक फटका बसतो..कधी पत, प्रतिष्ठा धोक्यात येते..कधी नात्यांत दुरावा निर्माण होतो.. या साऱ्या गोष्टींची पुन्हा भरपाई होत असेलही कदाचित, पण गमावलेली नाती तशीच हाती लागतात असंही नाही.. पण, मन दुरावली गेली तरी काहींच्या आठवणी आयुष्यभर व्यापून राहतात...या जखमांवर खपली चढत नसते.. ...जखमा अधुनमधून  ओलावत असतात..कधी ना कधी स्मृतींची कुपी रिती होत असते..मन सुगंधित करत राहते..आठवडाभरापूर्वी श्रीदेवी गेली..तिच्यामुळं अशीच एक जखम ताजी झाली..होळी, धुळवडीच्या सणांनी हळवी होत गेली ..ती तशी  झाली नाही, तर डोळ्यातल्या काजळानं  तीट लावलेल्या पन्नोच्या सुगंधी स्मृतींशी तो कृतघ्नपणा ठरेल..त्या अत्तराच्या दिवसांशी ती प्रतारणा ठरेल..

पन्नो खूप लहानपणापासूनची मैत्रीण.. माझ्यापेक्षा वयानं थोडी  मोठी..शाळा, कॉलेज सोबतच शिकलो..बालसुलभ मैत्री बहरत गेली..कोवळ्या वयात तनामनात झालेले बदल आम्ही जवळून पाहिले...
अगदी किशोर वयातच परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झालं..  नात्याला निराळा आयाम मिळाला.. निखळ मैत्रीपासूनचा नात्याचा लंबक काळजातल्या सखींपर्यंत झुकत गेला. .नजरेत संकोच दाटला..स्पर्शातली जादू समजली.. देहाची वीज झाली. .. नितळ भावना उत्कट झाल्या. तिची जगण्याची समज, परिपपक्वता जबरदस्त.. कसं काय पण ती डिट्टो श्रीदेवीसारखी दिसायची..तिच् तिची ओळखही होती. सौंदर्याचा अन बुद्धिमत्तेचा सर्वांगसुंदर मिलाफ तिच्या व्यक्तिमत्वात साधला गेला होता.. .आम्ही कॉलेजला असताना बॉलिवूडमध्ये श्रीदेवी टॉपवर होती..त्या नवथर वयात ही श्रीदेवी माझं आयुष्य बनली ..बालपणापासूनची मैत्री असल्यानं पुढंही आमची दंगामस्ती, रुसवेफुगवे कायम राहिले. त्याची परिभाषा बदलली होती. तिनं भरभरून प्रेम केलं.. मला वळणही  लावलं...व्यक्तिमत्वाला चमक द्यायला खूप धडपडली....नजरेनं आव्हान देणारी पन्नो नजरेतली आस ओळखायची..उमलताना चटका लावायची...कातरवेळेत मिठीत घ्यायची..निसर्गाची साद तिनं स्वीकारली ...पण तोल ढळू दिला नाही.. खूप मायेनं जपलं ..दुखऱ्या मनावर फुंकर मारताना माझी वेदना तिच्या डोळ्यांत उमटायची. सारे हट्ट पुरवले तिनं..मैत्री,प्रेम, वात्सल्य,जिव्हाळा, प्रीती, दोस्ती, माया, ममता सारे भावनाविष्कार त्या दिवसांत अनुभवता आले..साऱ्या भावना तिनं अलवार जपल्या....चांदण्यांची बरसात अनुभवली.. इतके एकजीव झालो की त्या दिवसांत परस्परांची  कुठलीच गोष्ट परकी राहिली नाही...तिचं एकंदरच वागणं, बोलणं अधिक प्रगल्भ होत गेलं.. ओढ वाढवत गेलं..कधी खटके उडाले की ही माझी सखी पत्र लिहायची..भावना व्यक्त करायची.पत्राखाली तिची टिपिकल सही असायची...तुझी श्रीदेवी...

पन्नोचा जन्म पौर्णिमेचा...त्यामुळं साऱ्या पौर्णिमा आमच्यासाठी खास असायच्या.. सण, उत्सवात आम्ही धमाल करायचो.. होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत तर खूप कल्ला.. तेव्हा परस्परांना रंग लावून पाण्यानं भिजवून काढण्यातली मजा काही और असायची..आमच्या या उत्कट नात्याची माहिती नातलगांना, मित्रांना सर्वांना होती.. मी ते कधीच् कुणापासून दडवलं नाही..लाज वाटेल असं  वागलो नाही..केलेल्या गोष्टीची लज्जा बाळगली नाही..पुढं कसं, काय ते नेमकं लक्षात येत नाही.. पण दुरावा होत झाला.तसे रुसवेफुगवे आधीही व्हायचे..अबोला व्हायचा...एकदा तो जास्त टिकला.. ..नात्याची वीण ढिली पडत गेली..पुढे पूर्ण सैलावली..मार्ग भिन्न झाले.. मित्र मैत्रिणींनी बरेच प्रयत्न केले..अहंकार..वयातला बालिशपणा  आड आला ..हे नातं कायमचं संपलं.. कायमचं. .

 तसं तर कुणाचंच आयुष्य कुणामुळं अडत नाही ..पण, बऱ्याच गोष्टी बदलत जातात.. तुलना होत राहते हे नक्की....थबकलो मी ही थोडाकाळ....परिस्थितीशी कडवा संघर्ष केल..नंतर मग जे होतंय ते स्वीकारत मी पुढं चालत राहिलो....नजर स्वच्छ झालेली अन नियत साफ. पुढं ही बरेच मित्र मैत्रिणी भेटत गेले..त्यात काही नाती कचकड्यासारखी तकलादू निघाली..काही तराजूत तोलणारे अन काहींना फक्त देहाच्या उत्सवात स्वारस्य ..पण निःस्वार्थीपणानं मनापासून जीव लावणारे, भरभरुन प्रेम करणारेही भेटले,  हे ही खरं..पन्नोशी नातं तुटलं त्याला आता दोन दशकं उलटून गेलीत..एक नक्की की,त्यानंतर कुठल्या सौंदर्याची  फारशी भुरळ पडली नाही....कुठल्या डोळ्यांचं आकर्षण वाटलं नाही..कुठल्या स्पर्शाची फारशी ओढ वाटली नाही...कुठला देह वासना चाळवू शकला नाही..कुठला खांदा तितका आश्वासक वाटला नाही...प्रतारणा तर मी तेव्हाही केली नव्हती, नंतरही कुणाशी केली नाही.. तेव्हाच्या काही सवयी मोडल्या..काही कायम राहिल्या.. तळ्यातल्या गणपतीला आणि बड्या दर्ग्यावर मात्र पुन्हा कधी आवर्जून गेलो नाही....नातं तुटल्यावर, रोजच्या आठ आठ तास सोबतीची सवय मोडताना खूप वेदना झाल्या...तितक्या पुढं आयुष्यात कधी झाल्या नाहीत..तितकं नैराश्य पुन्हा कधी आलं नाही..मन कणखर बनत गेलं.....गेल्या अनेक वर्षांत तिची भेट तर दूर, कुठल्याही माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संवादही नाही..वाढत्या वयात, बदलत्या नात्यात जगण्याचे प्राधान्यक्रम बदलतत राहतात..नवनवे भलेबुरे अनुभव येत जातात..अलिप्तपणा, तटस्थवृत्ती वाढत जाते..जुन्या घटनांची ओळख पुसट होत जाते.. अर्थातच् आयुष्य सुगंधित केलेली माणसं या ना त्या निमित्तानं  आठवत  राहतात.. परवा असंच झालं..जव्हारजवळ  शेरकीच्या पाड्यावर भटकत होतो.. होळीच्या, रंगांच्या उत्सवामुळं वातावरण चैतन्यमय झालेलं..तारप्याच्या तालावर आदिवासी पोरं पोरी  नाचत होते.. गाणी सुरू होती...एकमेकांना रंग फासला जात होता..मुखीयांनं मला शकुनाचा गुलाल लावला..मग अनेकांनी रंग  लावला..मोहाचं मद्य डोक्यात भिनायला लागलं होतं..गाण्याच्या तालावर पाय थिरकायला लागले होते..  होळीच्या केशरी ज्वाला  भडकल्या होत्या..आकाशात झेपावत होत्या..त्या प्रकाशात एकीचा  चेहरा सोन्यासारखा  लकाकला. श्रीदेवीसारखा भासला...काजळानं माखलेले तिचे डोळे काळजाचा ठाव घेत होते.अनिमिष नेत्रांनी तिनं पाह्यलं...मग डौलदार चालींनं येऊन नाजूक हातांनी अलगद माझ्या चेहऱ्याला रंग फासला. स्पर्श परिचित असल्यासारखा वाटला... .मन भूतकाळात गेलं. थंडगार वाऱ्यातही  त्या स्पर्शाची ऊब तयार झाली..मन कापरासारखं पेटून उठलं .ती धग
शरीर जाळत गेली..अन उभ्या देहाचीच् होळी झाली....

No comments:

Post a Comment