Sunday, 14 March 2021

पुणेकरांना वाचवा..


-------------------------
पुण्यातली आरोग्य व्यवस्था दररोज ढासळते आहे. बेड उपलब्ध न होणं किंवा ऍम्ब्युलन्स न मिळणं यात आता काही नवलाई राहिली नाही. प्रत्येकी आठशे बेड्सची क्षमता असलेल्या तीन जंबो कोविद रुग्णालयांचं गेल्या आठवड्यात लोकार्पण झालं. तरीही रुग्णांमागचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चॅनेल्सवर झळकलेल्या बातम्यांचा ओघ पाहता व्यवस्था जागेवर येईल असं वाटलं होतं.
पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं आज निधन झालं. कधीकाळी पुण्याचे प्रथम नागरिक असलेले एकबोटे यांनाही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत ही आरोग्य यंत्रणेची शोकांतिका आहे. त्यांच्यासाठी तर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही लक्ष घातलं होतं. तरीही काही होऊ शकलं नाही. एवढंच नव्हे, या माजी महापौरांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करायलाही जागा मिळायला विलंब झाला. 
 
कोरोनाच्या साथीने व्यवस्था किती मोडकळीस आलीये आणि उपलब्ध व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकणारे अधिकारी उरले नाहीत, हे यावरून पुरेसं स्पष्ट झालंय. बरं ज्यांनी जाब विचारायचा, तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा वचक पॅकेज जर्नालिझममुळे 'तृतीयस्तंभी' झालाय, हे काल पांडुरंग रायकर यांच्या प्रकरणावरून अधोरेखित झालंय. संस्थेच्या नियमांचं पालन करण्याच्या अटीमुळे पत्रकारांना लिहायला मर्यादा आल्या आहेत. पण, आता फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स अप सारखी कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत. निराळ्या नावाने तिथं लिहिता येतं. एका कोविद सेंटरचा मुद्दा काल ऐरणीवर आला. अन्य दोन सेंटरची काय परिस्थिती आहे ? याचं स्टिंग ऑपरेशन करायला हवं. आपत्तीच्या काळात पत्रकार अंकुश ठेवतात हा इतिहास आहे
पत्रकारिता केवळ चरितार्थाचं साधन नाही. समाजातल्या विपरीत घटनांवर आणि संबंधित घटकांवर अंकुश ठेवणारी ती वृत्ती अन व्यवस्था असते. अंतस्थात माजलेल्या अन दडपल्या, चिरडल्या जाणाऱ्या कल्लोळाला वाचा फोडायचं पत्रकारांचा
कर्तव्य असतं. तो वसा, ते व्रत जपायला हवं. लेखणीतली धग धगधगत ठेवायला हवी.

 
पुण्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांना किमान वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी आता जनआंदोलन उभं रहायला हवं. गेल्या चोवीस तासात एक हजार 764 नवे रुग्ण वाढलेत. दिवसभरात 48 लोक दगावलेत या साथीत. आतापर्यंत दोन हजार 401 रुग्णांचा मृत्यू झालाय. शासकीय आकडेवारीनुसार, 885 रुग्णांची प्रकृती गंभीर आणि 530 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 15 हजारहून अधिक रुग्ण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत.
अजून किती, कशी आणि कुणाच्या भरवशावर वाट पहायची? कोरोनाचा विषाणू हटेल, न हटेल पण त्याच्या प्रतिबंधासाठी उभारल्या गेलेल्या व्यवस्थांमध्ये सुसूत्रीकरण का नसावं? सगळे अधिकारी, कर्मचारी पूर्ण शक्तीने काम करताहेत असं गृहीत धरलं तरी दरररोज नव्या त्रुटी उघड होतायेत. जागतिक आपत्तीच्या काळात आता तरी सर्वांनी झटून काम करायला हवं. केंद्र ,राज्य शासनानं अरुण भाटिया, देवव्रत मेहता, टी चंद्रशेखर, अजय मेहता अशा प्रशासनावर वचक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलवून घ्यायला हवं. कठोर शिस्तीमुळे कुणालाही नको असलेल्या तुकाराम मुंडेंना किमान पुण्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुसूत्रीकरणाच्या शीर्षस्थानी बसवायला हवं. डॉ. रवी बापट, डॉ. रवीन थत्ते, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ.कपिल झिरपे, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. डी. बी. कदम, डॉ. अविनाश भोंडवे अशा जाणत्या डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमायला हवा. स्वाईन फ्ल्यूच्या काळात परिस्थिती हाताळलेल्या डॉक्टर्स,अधिकाऱ्यांशी मसलत करायला हवी. 2009 मध्ये पुण्यात या साथीचा उद्रेक झाला, तेव्हा महापालिका आयुक्त महेश झगडे, आरोग्य प्रमुख डॉ.एस. एस. परदेशी यांनी कशी परिस्थिती हाताळली होती, हे पहायला हवं. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा.
पुण्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. दर मिनिटाला सायरनचा वाजवत धावणाऱ्या ऍम्ब्युलन्स काळजात धडकी भरवताहेत.
दुसरीकडे बंदी असलेल्या इंदुरी फटाका सायलेन्सर बसवलेल्या बाईक्स धडाधड आवाज करत बेफिकीर घटकाचे दर्शन अधोरेखित करत आहेत. प्रश्न केवळ आवाजाचा नाही. मवाल्यांच्या बाईक्सच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात पोलिसांच्या गाडीला असलेला सायरन पिपाण्यासारखा वाटतोय. कोरोनासारख्या गंभीर आपत्तीमध्ये तरी सुष्ठ ध्वनी ठळक होण्याऐवजी कर्णकटू आवाज वाढणं हे कसलं लक्षण आहे ? हा शोर ढासळत्या व्यवस्थेचं द्योतक नाही का ? बाकी काय चाललंय हे सांगायची ही वेळ नाही.
माजी सनदी अधिकाऱ्यांबरोबरच घातक घटकांवर वचक निर्माण केलेल्या
के के कश्यप, अशोक धिवरे, टीकाराम भाल, अशोक चांदगुडे, दत्ता टेमघरे, अरुण वालतुरे अशा माजी पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा बोलावून घ्यायला हवं. राम जाधव, किशोर जाधव, सतीश गोवेकर, सुनील ताकवले अशा तडफदार विद्यमान अधिकाऱ्यांच्या नेमक्या नेमणुकीचं इंजेक्शन देणं ही पुण्याची गरज आहे.
व्यवस्था म्हणजे आपला सातबारा आहे असा भ्रम असलेल्या नाकर्त्या घटकांचा आता तरी नायनाट व्हायला पाहिजे. लष्कराला पाचारण करा, किंवा आता आमच्याच हातात सूत्रं द्या असं म्हणण्याइतका जनभावनेचा उद्रेक होण्यापेक्षा शासनानेच
व्यवस्था अधिक गतिमान, कार्यक्षम करायला अधिक कडक पावलं उचलली पाहिजेत....
हे पुणं आहे.
इथं दररोज पन्नास माणसं कोरोनामुळे मरतात हा शिक्का आतातरी पुसायला पाहिजे.
माणसं जगायला पाहिजेत.

 ब्लॅक मॅजिक

------------------
मध्यंतरी येरवड्यातल्या डेक्कन कॉलेज चौकात सिग्नलजवळच्या झाडाला एक कावळा लटकलेला दिसला. तो जिवंत नाही,हे सहजपणे कळत होतं. दोऱ्याला अडकला होता, पण तरीही जरा निराळं भासलं. सिग्नल पडल्यामुळे लगेच पुढं जावं लागलं. येताना पुन्हा तिथं थांबलो. नीट निरखून बघितलं. कावळा मांज्यात,दोऱ्यात पाय अडकून लटकला नव्हता. जाणूनबुजून कुणीतरी तो लटकवला होता. साधारणतः दोऱ्यात पाय अडकून किंवा गळ्याला फास बसला की पक्षी अडकतात. पण, या कावळ्याच्या मानेच्या समोरून दोरा आरपार होता आणि घराला किंवा गाडीला काळी बाहुली अडकवावी तसं त्याला लटकवलं होतं. या मुक्या पक्ष्याचा जीव कुणी आणि का घेतला असावा याचा उलगडा काही झाला नाही. कुणीतरी विकृत माणसानं तो उद्योग केला असणार हे निश्चित.
दररोज जाताना सिग्नलजवळ तो गळफास लावलेला कावळा दिसायचा. आपण धड त्याला तिथून काढूही शकत नाही, आणि काही करूही शकत नाही, या जाणिवेनं मन अस्वस्थ व्हायचं. त्या संदर्भात अनेकांकडं चौकशी केली. सिग्नलवरच्या भिक्षेकऱ्यांशी, तिथं नेहमी फिरणाऱ्या तृतीयपंथीयांशी बोललो. सगळ्यांनी सगळं पाहिलं होतं. पण कुणीच काही सांगत नव्हतं. कुणीतरी गंदा इलम किंवा नापाक इल्लम म्हणजे ब्लॅक मॅजिक करण्यासाठी त्या मुक्या पक्ष्याचा जीव घेतला असेल असं एकदोनजण म्हणाले. मंगळावर स्वारी करायच्या प्रगत युगात अजूनही एक वर्ग अजून ब्लॅक मॅजिक, जादूटोणा असल्या भंपक कल्पनांमध्ये अडकून पडलाय हे मन विषण्ण करणारं आहे.
एक काळ ज्योतिष, भविष्य,तंत्र-मंत्र आणि तसल्या गोष्टींचं मला अपार कुतुहुल होतं. ज्योतिष क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, तर दर पाच -सात वर्षांनी त्यातले ट्रेंड्स बदलत राहतात. पूर्वी फक्त पंचांग मांडून कुंडली बघायला महत्व होतं. मग हस्तसामुद्रिकाची लाट आली. पाठोपाठ अंकशास्त्र, फेस रीडर, वाचासिद्धी, कर्णपिशाच्च विद्यावाले, नाडी ज्योतिषवाले येत जात राहिले. मग मध्येच कधीतरी रमल विद्या, फेंग शुई, वास्तुशास्त्र असली फॅड आली आणि गेली. रुद्राक्षं, रत्नं, दर्ग्याचे ताईत, गंडे, उदी, पिरॅमिड, निरनिराळी यंत्रं अशा लाटा येतात आणि जातात. त्यातून तो व्यवसाय करणारे पैसे कमवतात अन् सामान्य माणसं मूर्ख बनत राहतात. यापलीकडं काही नसतं. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या भागातल्या भटकंतीमध्ये या क्षेत्रातली बरीच माणसं भेटत गेली. काही वर्षांपूर्वी लोहगाव विमानतळावर चंद्रास्वामींनाही भेटता आलं.जुने मित्र इन्स्पेक्टर विश्वासराव चौगुले तेव्हा तिथं ड्युटीवर होते. विशेष म्हणजे उशीर झालेल्या चंद्रास्वामीसाठी विमान ताटकळत ठेवण्यात आलं होतं. ही असली माणसं आणि त्यांचे अतर्क्य उद्योग पाहिल्यावर काही वेळा काही काळापुरतं मन संभ्रमित झालंही. पण हे सगळं झूट आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही.
अर्थात प्रत्येकाच्या श्रद्धा, विश्वास,भावना निरनिराळे. पण, हे नक्की की हे असले जादूटोण्याचे उद्योग सर्व स्तरात, सर्व भागात चालतात. करणारे सर्वजातीय आहेत अन फसणारेही सर्वधर्मीय आहेत. अगदी आदिवासी पाड्यांपासून, ग्रामीण,निमशहरी,शहरी सर्व भागात, झोपडपट्टयांपासून ते उंच हवेल्यांपर्यंत ब्लॅक मॅजिकचं खूळ पूर्वीपासून टिकून आहे. कुठल्यातरी भारलेल्या वस्तूमुळे आपलं बरं होऊ शकतं किंवा इतरांचं वाईट घडू शकतं यावर विश्वास ठेवणारे अनेक आहेत. त्याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा झडतात. पण, एसटी,लोकलमध्ये बंगाली बाबांच्या वशीकरण, करणीच्या जाहिराती बंद होत नाहीत. त्यांच्याकडची भक्तांची रीघही काय कमी होत नाही.
पुण्यात मागे एकदा निवडणुकीच्या आदल्या दिवशी एका उमेदवाराला एका मंत्रिकानं चार दिशांना चार गाढवं कापून टाकायचा अघोरी सल्ला दिला होता. त्याची खातरजमा केल्यावर 'सकाळ' मध्ये ती बातमी दिली होती. त्यावर मोठी चर्चाही झाली होती. त्याच वर्षी पुण्यातच् एका उमेदवारानं मंत्रिकाच्या सांगण्यावरून मतदान केंद्रांजवळच्या झाडांवर खिळे आणि बिब्बे ठोकले होते. त्याचे फोटोही आले होते पेपरमध्ये. हडपसर भागात मागे मोठ्या संख्येनं कुत्री मृतावस्थेत सापडत होती. तो ही प्रकार असल्याच् काही गोष्टीतून घडला होता अशी कुजबूज होती. काही वर्षांपूर्वी एका उद्योगपतीने मृत पत्नीला जिवंत करण्यासाठी बरेच तांत्रिक विधी केले होते. नंतर त्यानं खासगी विमानातून ते पार्थिव आंध्र प्रदेशमधल्या मांत्रिकाकडं नेलं. उद्योगपतीच्या मुलाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आईचा मृतदेह वडिलांनी पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यामुळं हे प्रकरण उघड झालं होतं.अर्थातच् त्या बाई काय जिवंत झाल्या नाहीत. खूप दिवसांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. ती सगळी माणसं उच्चस्तरीय होती. अर्थातच, पुढं हे सारं प्रकरण खूप वरच्या पातळीवरून दाबलं गेलं.
मध्यंतरी, साहिलबाबाची एक भलतीच चर्चा होती पुण्यात. बड्या राजकीय नेत्यांमध्ये, अंडरवर्ल्डमध्ये आणि उद्योगपतींमध्ये त्याची उठबस होती. जनरली आपल्याकडे असलेले गुण, नैपुण्य,कला,धन,बळ हिरावून जाऊ नये या भीतीने बरेच कलाकार, क्रीडापटू या बुवाबाबांच्या भजनी लागतात. अंडरवर्ल्डमध्ये सर्वाना जीवाची धास्ती असते, कोर्ट केसेस असतात, त्यामुळं ही मंडळी ब्लॅक मॅजिकचा आधार घेताना दिसतात. साहिलबाबा माझ्या काही जुन्या मित्रांचा मित्र. एकंदर काय प्रकरण आहे, हे बघून यावं म्हणून एकदा त्याच्याकडे गेलो. कॅम्प भागात मोक्याच्या ठिकाणी त्याचा बंगला. तिथंच दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये त्याचा मंगळवारी अन शुक्रवारी दरबार भरायचा. तिथलं वातावरण भयचकित करणारं होतं. जवळपास पंधरा-वीस फूट उंचीची बटबटीत रंगवलेली कालिमातेची उग्र मूर्ती काळजात धडकी निर्माण करणारी होती. मारुती अन म्हसोबाच्या मूर्तीही तितक्याच भव्य अन तशाच उग्र. गर्द, चमकदार शेंदूर फासलेल्या,भेदक डोळ्याच्या त्या मूर्त्याही चटकन लक्ष वेधून घ्यायच्या. तिथंच एक कुठल्यातरी पिराची मजार होती. सगळ्या मूर्ती,मजारीला,फोटोंना मोठमोठे हार घातलेले. फोडलेली कच्ची अंडी, मांस, मद्य आणि फळांचा भोग चढवला होता. उदाधुपाच्या धुरानं वातावरण भारून गेलेलं. चपाती, हा बाबाचा नोकर. तो लायनीने लोकांना वर हॉलमध्ये सोडत होता. खास माणसं बाबाला त्याच्या निराळ्या खोलीत भेटत होती. मित्र मला त्याच्याकडे घेऊन गेला. कुणीतरी दाढीधारी,
माळाबिळा घालणारा बाबा, महाराज असेल असं आधी वाटलं होतं. पण,त्याला पाहून जरा धक्काच बसला. कारण मनात योजलेल्या प्रतिमेपेक्षा त्याचं व्यक्तिमत्व बरंच निराळं होतं. जीन्सचा शर्ट, जीन्स पॅन्ट, बोटात नवग्रहांच्या बटबटीत अंगठ्या, दोन्ही हातात सोन्याची ब्रेसलेट्स, कडी, गळ्यात सोन्याचे जाडजूड गोफ अन कानात हिऱ्याच्या कुड्या घातलेला हा बाबा माझ्या पुढ्यात उभा होता. साहिलबाबा तेव्हा जेमतेम तिशीत असावा. गप्पा मारताना निरनिराळ्या ओळखी त्यानं सांगितल्या. सगळ्या देवांची नावं, दर्ग्यांचे उल्लेख त्याच्या बोलण्यातून येत होते. मुंबई पुण्यातल्या बऱ्याच वजनदार नेत्यांशी, गँगस्टर्सशी सलगी तो बोलण्याच्या ओघात दाखवत राहिला. बहुदा समोरच्याला प्रभावित करायचा त्याचा तो फंडा असावा. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी निघालो. खाली दरवाजापर्यंत सोडायला येऊन अदब दाखवायची संधी त्यानं सोडली नाही. त्यानंतर 'चित्रलेखा'तून त्याला जाम फटकवलं. पुढेही अनेकदा आमच्या भेटी झाल्या. पण, त्या लेखाबद्दल तो कधी वावगं बोलला नाही.
त्याचकाळात दाशम हा एक तृतीयपंथीय जादूटोण्यासाठी प्रसिद्ध होता. बाबाची त्याची या धंद्यात स्पर्धा. त्यातून ते एकमेकांविरुद्ध करणी,मूठ असे बरेच उद्योग करतात असं बाबाच्या बोलण्यातून समजलं. दाशमचीही एकदा पुलगेट भागातल्या त्याच्या दरबारात भेट झाली. प्रथमदर्शनीच भयंकर उग्र दिसणारा दाशम बोलण्यातूनच समोरच्याला गार करून टाकायचा. त्याच्याही दरबारातलं वातावरण साधारण तसंच.
जादुटोणा करून आपण
कुणाचंही काहीही करू शकतो हा त्या दोघांचा विश्वास. त्यासाठी ते सांगत असलेले आणि करत असलेले उपाय अत्यंत अघोरी, अतर्क्य आणि अनाकलनीय असायचे. हा दाशमही चांगला परिचित झालेला. छान बोलायचा तो. पण, त्यांचं विश्वच् निराळं होतं. भलत्याच भ्रामक दुनियेत ते वावरायचे. अर्थात हे दोघेच फक्त असा उद्योग करायचे असं नव्हे, तर आताप्रमाणेच तेव्हाही अनेक तांत्रिक मांत्रिक ठिकठिकाणी होते. पण, हे दोघे लक्षात राहिले, ते त्यांच्या दाट परीचयामुळं.
मध्यंतरी, एकदा फलटणला निघालो होतो. कंटाळा आला म्हणून तरडगावच्या पुढं गाडी बाजूला घेऊन थांबलो. सहज पलीकडे लक्ष गेलं, तर तिथं काहीशी विचित्र गोष्ट दिसली. निरखून बघितलं तर तिथं उतारा टाकलेला. एका परडीत खेळण्यातली छोटीशी बैलगाडी, त्यात हिरवा कपडा,हिरव्या बांगड्या,खिळे, काळी बाहुली, हळद, कुंकू, बुक्का, लवंगा आणि बाळाप्रमाणे दिसणारी एक रबरी बाहुलीही. खूप विचित्र वाटणारा हा प्रकार होता. दोन महिन्यांनी त्याच रस्त्याने माळशिरसला निघालो होतो. तरडगावच्या अलीकडं रस्त्याचं काम चालू होतं. तो उतारा सहज आठवला. अंदाजाने साधारण त्या ठिकाणी पुन्हा थांबलो. कुणीतरी तो व्यवस्थित उचलून पलीकडं शेतात ठेवला होता. माणसाला अशा गोष्टींचं किती भय असतं हे लक्षात आलं. एखाद्या बाळंतिणीला, नवविवाहितेला,लहान बाळांना अपाय व्हावा असल्या विकृत विचारानं असले प्रकार ग्रामीण भागात सर्रास चालतात. अर्थात, अमावस्या, पौर्णिमेला असले प्रकार करणारे महाभाग शहरातही दिसतात.
मध्यंतरी, जव्हारनजिकच्या पाड्यावर एका भगताची भेट झाली. पंचक्रोशीतले आदिवासी त्याच्याकडं समस्या घेऊन येतात. मग तो पाटीवर तांदूळ मांडून काहीबाही बघतो. भस्म,ताईत मंतरुन देतो. सुलट्या, उलट्या पिसाची कोंबडी मारायचे उपाय सांगतो. त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्याच्या घरातली झोपाळ्यावर बसलेली हिरवट डोळ्यांची खाष्ट म्हातारी जाम लक्षात राहिली.
कुणी,कुणावर श्रद्धा ठेवायची, कशावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा.
काळी जादु हे थोतांड आहे,याबद्दल किमान माझ्या मनात तरी संदेह नाही. पण, आजच्या प्रगत युगातही हे सगळं किती वेगानं खालपर्यंत झिरपत चाललंय हे भयानक आहे. व्यवसायामुळं, वृत्तीमुळं माझी बरीच भटकंती चालते. कुतूहलापोटी बहुतेक सर्व क्षेत्रातल्या मंडळींशी संबंध येतो. परिचय होतो, काही मित्र होतात, काहींशी दुरून का होईना संपर्क टिकून राहतो. वैयक्तिक काही अगम्य प्रश्न पडले, की त्या त्या क्षेत्रातल्या मंडळींकडं त्याबाबत विचारत राहतो. सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असलेल्या, अर्थातच भ्रामक विश्वात विशिष्ठ घटनेबद्दल काय माहिती आहे, काय चर्चा चाललीय हे उमजत जातं. घडीभर टाईमपास होतो. गेला महिनाभर झाडावर लटकलेला कावळा मनात घर करून बसला होता. त्याबाबत मिळालेली माहिती समाधान करणारी नव्हती. मग, एकदा दाशमकडे निघालो. चिमण्या कावळ्याचे बळी द्यायचा तोडगा नेमका कुठल्या समस्येवर आहे ? कोण असलं उद्योग करतं हे जाणून घ्यायचं होतं. कॅम्पमधून जाताना साहिल बाबा आठवला. त्याच्याकडं गाडी वळवली. तिथं एरवी बंगल्याजवळ कोपऱ्यात चपाती उभा असायचा. तिथं गाडी उभी केली. कुणीतरी उभं होतंच्. जवळ गेल्यावर लक्षात आलं, की तो चपाती नाही;तर साहिलबाबा आहे. बऱ्यापैकी त्याची रया गेली होती. त्यानं एका झटक्यात मला ओळखलं. कॉफी मागवली. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग म्हटला 'अब सब काम बंद किया मैने। पिछे कुछ बिना वजह तकलीफ उठानी पडी। अपना तो कुछ है ही नही वैसा। बँकॉक मे हॉटेल ले लिया हैं पार्टनर्शीप मे। उसमे से चलता हैं सब। बाकी वो दाशम भी मर गया बीच मे.....।'
बाबाचं बोलणं ऐकून मेंदूला झिणझिण्या येत होत्या. एखादा मांत्रिक जादूटोण्यातुन कोट्यवधी रुपये जमवतो काय? विदेशात हॉटेल घेतो काय ?सगळंच चकित करून टाकणारं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर बऱ्याच बुवा बाबांची खुलेआम चाललेली दुकानं बंद झाली. बहुदा त्यामुळंच् बाबाचाही दरबार उठला असावा. मूळ प्रश्न विचारायचं राहून गेलं होतं. दाशम उरला नव्हता तर त्याच्याकडेही जायचा काही प्रश्न उरला नव्हता. घरी येऊन पडलो, तर झोप लागून गेली. रात्री बराच वेळ जोरदार हवा सुटली होती. सकाळी उरकून निघालो. डेक्कन कॉलेजच्या चौकात नेहमीप्रमाणे लक्ष गेलं. रात्रीच्या पावसात नेमकी तीच फांदी तुटून पडली होती अन कावळा काही दिसला नाही. माणसानं केलेलं पाप निसर्गानं धुवून टाकलं होतं. निष्प्राण कावळ्याला बहुदा मुक्ती मिळाली होती.

मैत्र

 मैत्र

- - -
वयाची पन्नाशी गाठत असताना अजूनही शाळेतला, पार इयत्ता पहिलीचा वर्ग जसाच्या तसा आठवतो.अश्विनीनं तेव्हापासूनची ती मैत्री निर्व्याजपणं जपलीय. नात्यातला निरागसपणा टवटवीत ठेवलाय.
तो वर्ग तसाच डोळ्यापुढं ठेवलाय. 'टप टप पडती अंगावरती फुले..' ही कविता शिकवतानाच्या जोशी बाई आणि इयत्ता चौथीचा शिवाजी मराठा शाळेतला वर्ग अजून लख्ख नजरेसमोर आहे.
कळत नव्हतं इतका लहान असल्यापासून सत्येन सावलीसारखा सोबत आहे. एसके, प्रताप, विजू आहेर, राजू चौरे, सचिन पाटील, अजय दराडे, क्रांती, माधुरी, उल्का,संजू कटारिया असे कितीतरी मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये भेटले. एसपीच्या विस्तीर्ण कॅम्पससारखंच मनही विशाल असलेल्या या मित्रांमुळं तिथल्या प्रत्येक इंचावर काही ना काही आठवणी रेंगाळल्यात. कॉलेजच्या दगडी भिंतींनाही हेवा वाटावा अशी आमच्या दुनियादारीची दास्तान आहे. प्रचंड गदगदून आल्यावर मजबूत खांदा देऊन हे दोस्त मला मोकळं करतात.
आंबिल ओढा कॉलनीतले मित्र आयुष्याचा मोठा हिस्सा आहेत. कसलीही पर्वा न करता अर्ध्या रात्रीत मदतीला धावून येणारे अनिल, पिंट्या,विक्रम, कमलेश,अजित,सतीशसारखे दोस्त सगळ्यांना मिळायला हवेत. त्यांनी जगणं बिनधास्त केलं. कॉलनीचं भक्कम पाठबळ असल्यानं कधी कुणाचं भय वाटलं नाही. प्रॉब्लेम्स फाट्यावर मारून कसं जगायचं हे तिथं नकळत शिकत गेलो.
पत्रकारितेच्या निमित्तानं समाजाच्या बहुतेक सगळ्या,चांगल्या वाईट क्षेत्रातली खूप माणसं भेटत गेली. मुकुंददादा पंडित, अण्णा थोरात, प्रताप परदेशी, उदय जगताप,अजय तायडे, बाळा जगताप ही मंडळी मित्र तर बनली; जगायचा आधारही ठरली. औषधाची गोळी देणारे डॉ. अविनाश भोंडवे, डॉ.कुमार मांढरे, डॉ.गोजीरा, डॉ. शिल्पा छान मित्र झाले, अन बंदुकीची गोळी अधिकृतपणे बाळगणारे राजेंद्र जोशी, राम जाधव, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र जोशी, रेखा साळुंखे,नीलम जाधव,स्मिता जाधव, क्रांती पवार अशा मित्रांनी जगणं समृद्ध केलं.
काश्मीरचा विमलवैना सुंबली, जयपूरचे जुगल प्रजापती, माथेरानचे संतोष पवार, पाचगणीचे सुनील कांबळे, कोल्हापूरची मीना पोतदार, गोव्याचा केदार वझे, सांगलीचे गणेश जोशी अन साताऱ्याचे श्रीकांत कात्रे, मुंबईची दीप्ती, तेजल,थेट भंडाऱ्याच्या मौसमी अशा कितीतरी मंडळींशी किती जुनी मैत्री आहे याचा हिशेब लावणंच चुकीचं आहे. कितीतरी लांबून दादुस अशी निरागस साद देणाऱ्या
विरारच्या रीमाला कसं विसरू शकतो ?
अक्कलकोटला गेल्यावर खूप आपुलकीने थेट स्वामींच्या पुढ्यात उभे करणारे गणेश दिवाणजी, जव्हारसारख्या दुर्गम भागात भेटलेल्या डॉ.अनिता तसंच राजेश आणि दीपाली या तेंडुलकर दाम्पत्यामुळं तिथं कधी परकं वाटलं नाही. त्यांच्या निर्लेप मैत्रीनं तिथं जायची ओढ निर्माण झाली. त्या भागाशी कायमचे बंध जुळले.
विश्वजीत आणि कपिल हे दोघं भेटूनही आता बरीच वर्षे झालीत. दोघे उत्तम फोटोग्राफर आणि जानी दोस्त. आमच्या तिघांचाही जन्म सातारा जिल्ह्यातल्या फलटणचा. एकाच हॉस्पिटलमधल्या, एकाच
वॉर्डमधला. अर्थातच निरनिराळ्या वर्षातला. बहुदा नाळ एकाच जागेवर पुरली असणार, त्यामुळंच मैत्री इतकी गहरी झालीय.
जवळच आहे, मैत्रीही आहे; पण भेटलो नाही अशीही काही नाती आहेत. अस्सल देशमुखी थाटात आब राखून संवाद साधणाऱ्या मीनल जाधव अन् पीएसआय ते सिनियर पीआय असा ज्यांचा प्रवास पाहत आलो त्या वर्षा पाटील यांचीही मैत्री संस्मरणीय आहे. परस्परांना नेहमी पाहत आलोय, पण कधीच कसलाही संवाद नाही. अव्यक्त राहूनही त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात मैत्रीची निकोप भावना दडलीय हे ही अनेकांच्या नजरेतून जाणवतं .
नीलमशी मुलीपेक्षा मैत्रीचं नातं दाट आहे. ती खूप जवळची, घट्ट दोस्त आहे. मल्हार माणूस नाही म्हणून काय झालं ! श्वान जन्म घेतलेला तो एक गोड अन तितकाच हट्टी दोस्त आहे. बाबाजी गुरू आहेत,मार्गदर्शक आहेत; तितकेच हळव्या मनावर फुंकर घालणारे मित्रही आहेत.
हे मैत्र, ही हिरे माणकं हीच अस्सल संपत्ती. आयुष्याच्या कोंदणात या रत्नांनी शान वाढवलीय. त्यांच्यामुळं जगणं सुसह्य झालं. जगायची उमेद वाढली. लखलखीत
रत्नांइतकीच ही नाती सदासतेज चमकदार राहतील हे नक्की..

मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

Thursday, 22 November 2018

मेंटल हॉस्पिटल


मेंटल हॉस्पिटल
.........................
             ..बातमीदारीच्या निमित्तानं येरवड्याच्या  जेलमध्ये अनेक वाऱ्या झाल्या...पण तिथं समोरच् असलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचा प्रसंग सुरुवातीला बरीच वर्षं आला नव्हता..कथा,कादंबऱ्या अन काही चित्रपटांमुळं, वाचलेल्या  मेंटल हॉस्पिटलची  निराळीच प्रतिमा मनात होती.. .बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट... 1995 च्या सप्टेंबर महिन्यात तिथं एक गैरप्रकार घडल्याचं कानावर आलं.तेव्हा पत्रकारितेत तसा नवखाच् होतो..त्या हॉस्पिटलमध्ये सहज आत जाणं अन माहिती घेणं तेव्हाही शक्य नव्हतं...मग त्या भागातले मित्र शोधले...विक्रमला घेऊन छुप्या रस्त्यानं हॉस्पिटलमध्ये शिरलो.. रक्षकांना गुंगारा देत अख्खा दिवस तिथं घालवला...तिथलं वातावरण अनुभवलं..  स्वतःची ओळख हरवून बसलेले , भलत्याच मनोविश्वात वावरणारे रुग्ण पाहिले..शॉक ट्रीटमेंटच्यावेळी असह्य वेदनांमुळं त्यांनी मारलेल्या  किंकाळ्या ऐकून मुळासकट हादरलो..त्यांचं निकृष्ट अन्न,  मळके कपडे, असह्य दुर्गंधी अन एकंदरीतच् कोंडवाड्यातल्या जनावरापेक्षाही भयाण अशी त्यांची त्यांची  अवस्था आठवली की आजही अंगावर सरर्कन काटा उभा राहतो. तिथल्या चांगल्या वाईट घटनांच्या बातम्या देऊ लागल्यावर सयाजीसारखे  तिथले अनेक कर्मचारी  मित्र झाले..जुने रुग्णही ओळखायला लागले.. तिथं जाणं, सयाजीला, तिथल्या कर्मचा-यांना भेटणं नित्त्याचं झालं होतं...अलीकडच्या काही वर्षांत मात्र त्यात काहीसा खंड पडलाय
            गेल्या आठवड्यात सयाजी भेटला..चहा प्यालो.नाश्ता केला..खूप दिवसांनी भेट झाल्यानं खूप गप्पा झाल्या....मेंटल हॉस्पीटलमधल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या..  मनोविकाराने पछाडलेल्या, नरकयातना भोगत असलेल्या रुग्णांचे चेहरे नजरेसमोर आले..निष्प्राण डोळ्यांनी रुग्णालयाच्या आवारात फिरत असलेले अन
कर्मचा-यांच्या मारहाणीला भेदरून झाडांमागं, झाडावर लपून बसलेले कित्येक चेहरे लक्खपणे आठवले.ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या बंधुंशी तिथं झालेली भेट ताजी झाली..

         घनदाट जंगलानं वेढलेल्या दीडशे एकरच्या विस्तीर्ण परिसरात असलेलं येरवड्याचं मेंटल हॉस्पिटल  आशिया खंडातलं सर्वात मोठं मानसोपचार रुग्णालय..पण होतंय काय की एकतर ते शहराच्या बाहेरच्या बाजूला आहे अन कारणाशिवाय सामान्य लोकांना तिथं जायला प्रवेश नाही...त्यामुळ आत काय चाललंय हे काही कळू शकत नाही..वीस वर्षांपूर्वी  मोबाईल, इंटरनेट नसण्याच्या जमान्यात तर तिथलं काहीच बाहेर यायचं नाही...अधिकृत तुटपुंजी माहिती मिळवायला 6692543 हा तिथला फोन होता.. संध्याकाळनंतर तो ही बंद असायचा...त्या काळात सयाजीनं मला खूप मदत केली..तो तिथं वोर्ड बॉय होता.. काळ्याभिन्न रंगाच्या, धिप्पाड सयाजीचं मन कोमल अन संवेदनशील...स्वभाव बोलघेवडा..वडिलांच्या जागेवर तो त्या नोकरीत चिकटला अन त्या रुग्णालयाच्या अनोख्या विश्वाचा एक भाग बनून राहिला. ..तिथल्या रुग्णांच्या अनेक करूण कहाण्या त्यानं सांगितल्या..कित्येक धोकादायक, हिंसक रुग्ण मला जवळ नेऊन दाखवले...तिथं असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांचे नातलग त्यांना एकदा तिथं सोडून गेले की पुन्हा परततही नाहीत... .कित्येक लोक खोटा नाव पत्ता द्यायचे...रुग्ण बरा झाल्यानंतरही केवळ नेमकं नाव गाव याचा पत्ता नसल्यानंसैरभैर व्हायचा....पळून जायचा.एकतर स्वतःच्या घरी किंवा त्यांनी पुन्हा इथे आणून ऍडमिट करू नये म्हणून लांब कुठल्या तरी गावी मजुरीची कामं करू लागायचा..नातलगांचा खरा पत्ता नसल्याने वाऱ्यावर आलेल्या रुग्णांची वाताहात रोखणारी व्यवस्था किमान तेव्हा तरी अस्तित्वात नव्हती..

                    रुग्णालयात या रुग्णांना दिली जाणारी पशुवत वागणूक दिसली.. मानवतेचे गोडवे गाणाऱ्या या समाजातील नाती किती कोरडी आहेत याचं प्रत्यंतर देणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची अमानुषताही नजरेस पडली...वेड्या मायेनं रुग्णांना कुरवाळणारे तिथले कर्मचारी पाहिले अन खोटा नाव पत्ता देऊन एकदा दाखल केलेल्या रुग्णाकडे आयुष्यभर पाठ फिरवणारे काहींचे अमानुष अनुभवही समजले.. भोपळ्याचे तोंडात मावणार नाही एवढया मोठया आकाराचे तुकडे  चुलीवर शिजत असलेलं कालवण पाहिलं...जनावरंही तोंड लावणार नाहीत अशा त्यांना दिल्या जात असलेल्या जाड्याभरड्या कोंड्याच्या चपात्या पाहिल्या..त्यांच्या अंगावर ना  धड कपडे ...ना धड अंथरुण,  ना धड पांघरूण... कित्येक रुग्ण ऐन हिवाळ्यात तिथल्या थंडगार फरशीवर कुडकुडताना पाहिले....कित्येकजण वेदनांमुळं विव्हळायचे...रात्र रात्र जागायचे.. आठपंधरा दिवसातून एकदा कधीतरी सर्कसमधल्या प्राण्यांना घालतात तशी पाण्याच्या फवाऱ्यानं  रुग्णांना सामूहिक आंघोळ... साहजिकच् अस्वच्छतेमुळं अनेकांना खरूज, नायट्यासारखे त्वचारोग जडतातच्....काहींना काबूत आणण्यासाठी होत असलेली अमानुष मारहाणही केली जाते असं समजलं अन् एकंदर सारा प्रकार पाहून माणूसकीवर, व्यवस्थेवर विश्वास तरी का ? आणि कसा ठेवायचा असा मला प्रश्न पडला.. .बरं याबद्दल दाद मागायची कुणी ? कशी ? आणि कुणाकडं ? इथल्या रुग्णांना काही कळत नाही..ज्यांना कळतं त्यांना बोलायची बंदी...कुठं वाच्यता केली तर आणखी मार बसायचीही भीती...निम्म्याहून अधिक रुग्णांचे नातलग भेटायलाच येत नाही..अन जे येतात ते लक्ष देत नाही...सारा असा गुंतागुंतीचा मामला.......एकंदर परिस्थितीमुळं शरीरानं अन् मनानं हतबल झालेल्या  इथल्या रुग्णांच्या निष्प्राण डोळ्यांतून टपकणारे अश्रू आठवले की आजही मनात कालवाकालव होते. महिलांच्या वोर्डमधली स्थिती तर अतिशय केविलवाणी. संवेदनांची,देहाची जाणीव नसलेल्या, शून्यात नजर लावून बसलेल्या कित्येक महिलांचे निस्तेज चेहरे आजही डोळ्यांसमोर उभे राहतात...तिथल्या एकंदरच साऱ्या रुग्णांच् पुढं काय होतं ? हा मला कायम अस्वस्थ करणारा प्रश्न आहे...वर्षनुवर्षे या हॉस्पिटलमधल्या साधारणतः अडीच हजार मानसिक रुग्णांच्या सान्निध्यात राहिल्यानं तिथल्या अनेक कर्मचा-यांचंही मानसिक संतुलन ढळत जातं हे ही एक तिथलं कटुवास्तव...

          रुग्णालयाच्या या साऱ्या प्रवासात सयाजी माझ्यासोबत असायचा..तो अगदी कोवळ्या वयापासून या रुग्णालयात फिरलाय..तिथली इंच न इंच त्याला माहिती...सुट्टीच्या दिवशीही तो रुग्णालयातच फिरत असतो...तिथल्या रुग्णांशी हवापण्याच्या गप्पा करतो...कोण नवीन आलंय,कुणाला कसला त्रास आहे, कुणाला काय आवडतं,   कोण बरं झाल्याचं सोंग आणतयं,  कोण खरंच बरं झालंय याची त्याला इत्यंभूत माहिती..खरंतर मेंटल हॉस्पिटल म्हणजे सर्वसामान्यांना फारशी माहिती नसलेली, त्याबद्दल औत्सुक्य असलेली काहीशी भीतीप्रद जागा..अन ते खरंही आहे...पण सयाजी तिथं एवढा रूळलाय की मनोरुग्णांच्या शरीरातून सुटणारा विशिष्ट उग्र दर्प आता त्याच्याही अंगाला येत असतो...त्यानंच् रुग्णालयातला एक जरा सुस्थितीत असलेला वोर्ड दाखवला....तिथं मधू लिमये यांचे धाकटे बंधू भालचंद्र लिमये पेपर वाचत पहुडले होते..ते बऱ्याच वर्षांपासून तिथं ऍडमिट होते..ते पेपरमधल्या काही ओळी ते बॉलपेनाने खोडून काढत होते.. त्यांच्याशी मी संवाद साधला...थोडं नीट काही असंबद्ध ते बोलले.... मधू लिमये निवर्तल्याचं ठाऊक आहे का ? असं मी त्यांना विचारलं.... त्यावर, पेपरवाले काहीपण छापतात असं म्हणून ते हसले व पुन्हा पेपर वाचनात गढले.... तिथल्या अनुभवांबाबत   मनोरुग्णांच्या नरकयातना ' ही माझी वृत्तमालिका 'सकाळ' ने ' चार भागात प्रसिद्ध केली अन एकच गदारोळ उठला...सेना-भाजपचे सरकार नुकतेच सत्तेत आलं होतं..पुण्याच्या मंत्र्यासंत्र्यानी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली...माझे मित्र आमदार दीपक पायगुडे तेव्हा पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले होते...त्यांनी या रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबाबत आवाज उठवला...शासन दरबारी या वृत्त मालिकेची दखल घेतली गेली...रुग्णालयावर नवी समिती नेमली गेली...निधी मंजूर झाला..काही इमारतींची कामं सुरू झाली..रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा जरा  सुधारला..पूर्वीपेक्षा आता परिस्थिती बरी आहे..आताही निरनिराळी कामं, उपक्रम तिथं सुरू झाल्याचं समजतं.. नुसती व्यवस्था बदलून उपयोग नाही...सयाजीसारख्या कनवाळू मनाच्या लोकांची तिथं गरज आहे.....

             खरंतर तुरुंग अन् मेंटल हॉस्पिटल ही दोन्ही ठिकाणं एकापरीनं वाईटच्... म्हणजे कैदी किंवा मनोरुग्ण होऊन तिथं जाणं अत्यंत वेदनादायी......विस्कळीत  मनोव्यापार सुरळीत करण्यासाठी या  व्यवस्था निर्माण केल्या गेल्यात...... सामाजिक तत्त्वामुल्यांशी विसंगत, विघातक वृत्तीचं तिथं नियमन होणं अभिप्रेत असतं..त्यासाठी कैद्यांना अन रुग्णांना  विलक्षण यातना सोसाव्या लागतात... वेदनांचे अनंत कल्लोळ तिथं नित्यनवे उमटत असतात.. जितेपणीच् कितीतरीजण रोज तिथं मरत अनुभवत असतात.. .समाजात त्याविषयी नेमकी माहिती अन् पुरतं गांभिर्य नसावं बहुधा..त्यामुळंच कित्येकदा सहज संवादातही जेल अन मेंटल हॉस्पिटलबद्दल सवंग विनोद केले जातात; तेव्हा मनोरुग्णांचे चेहरे डोळ्यासमोर  येतात....त्या मूक वेदना काळीज कुरतडायला लागतात अन् तिथं पुन्हा जायला मी नव्याने सज्ज होतो...





अश्विन नाईक - एक माणूस

अश्विन नाईक - - एक माणूस. . . .
-  -  -  -  -  -  -  -  -  - -  -  -  -

                               15 वर्ष उलटली या घटनेला . .. पण अजून स्पष्ट आठवतंय...सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास फोन वाजला...नीलम लहान होती तेव्हा...पटकन पळत जाऊन फोन उचलायची....तिनेच फोन उचलला...पलिकडून कोणतरी बोलत होतं आणि ही छानपैकी गप्पा मारत होती...काय चाललंय..कसं चाललंय...कुठल्या शाळेत जाते...कोणत्या इयत्तेत आहे....कोणता विषय आवडतो...मॅडम कोणत्या आहेत?....वगैरे वगैरे....ऐकत होतो सारं......नीलूला खुणेनेच कोण आहे हे विचारले? तिने आकाशाकडे बोट दाखवले...मला काही उलगडा होईना....मी फोन घेत हॅलो म्हणालो....आकाश बोलतोय...पलिकडून आवाज आला... ......किती भारी वाटतं रेऽऽऽ ....छोट्‌या मुलांशी बोलून....माझीही मुलगी साधारण एवढीच आहे....मी बोलतो तिच्याशी..पण भेटू शकत नाही रेऽऽऽ......तो म्हणाला.....
काळजात हललं माझ्या...तो अश्विन होता...अश्विन मारूती नाईक . .. मुंबई अंडरवर्ल्डमधील तत्कालीन प्रमुख सूत्रधार ....एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनात स्थित्यंतरं तरी   किती येऊ शकतात?? आणि इरेला पेटून त्यावर मात करत....संघर्षाशी सामना करीत माणूस स्थिरसावर व्हायचा किती आटोकाट प्रयत्न करतो...याचं अश्विन एक उत्तम उदाहरण ठरेल...

        मुंबई अंडरवर्ल्डमधील अश्विन नाईक या नावाला काय वजन आहे किंवा होते हे बहुतेकांना ठावूक आहे...रंगनाथ पठारेंनी  '' हारण'' मध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात किती उलथापालथी होऊ शकतात हे दाखवलंय..त्यास्वरूपाची आणि त्यापेक्षाही भयंकर स्थित्यंतरं अश्विनच्या आयुष्यात घडलीत....त्या बदलांचा...घटनांचा...मी दूरून का होईना पण एक साक्षीदार आहे... दादरमध्ये भाजी विक्रेत्याच्या घरात जन्मलेला अश्विन कुशाग्र बुद्धीचा...क्रिकेट उत्तम खेळायचा...रमाकांत आचरेकरांचा लाडका शिष्य....बलविंदर संधू, लालचंद राजपूत, सुलक्षण कुलकर्णी हे त्याचे तत्कालीन सहाध्यायी...काही दिवस वय कमी पडलं म्हणून अश्विनचा  महाराष्ट्राच्या रणजी संघातील प्रवेश हुकला.... पुढे बरीच समिकरणं बदलत गेली...त्याच्या आयुष्याचा पटही बदलत गेला.....तो कितीही साधाभोळा असला, तरी त्याचा मोठा भाऊ अमर म्हणजे अमर नाईक हा मुंबईतील बडा गॅंगस्टर होता...80-90 च्या दशकात मुंबईवरील वर्चस्व राखण्यावरून दाऊद, अमर नाईक आणि अरूण गवळी यांच्या टोळ्यांमधील संघर्ष टीपेला पोचला होता...त्यामध्ये दाऊदने त्याचा भाऊ शाबीर व गवळीने त्याचा भाऊ पापा गवळी गमावले.....खबरदारीचा उपाय म्हणून अमरने अश्विनला आक्सफर्डला शिकायला पाठवले...तेथे  त्याने इंजिनीयरींगची पदवी घेतली...तेथून मुंबईला परतल्यावर त्याच्यावर दाऊद टोळीनने प्राणघातक हल्ला केला...त्यानंतर काही दिवस त्याने निरनिराळे नोकरी, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला...पण, मुंबईत राहणं दिवसेंदिवस कमालीचे जोखमीचे झाले होते...लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे त्याला प्राण वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने पळाला....आणि पळतच राहीला . . ..

                         जगायचं असलं तर शिका-याची शिकार करावी लागते....पारध व्हायचं का शिकारी हे ठरवावं लागतं.....पारध होऊ द्यायची नसेल, तर शिका-याची शिकार करावी लागते हा अंडरवर्ल्डचा नियम....अश्विन कसा अपवाद ठरणार? पण पारध टाळण्यासाठी त्याला जी दिव्य पार पाडावी लागली त्याला अंतच नाही....जगभर तो फिरला....देशोदेशींचे मित्र जोडले...पावडर सिंडीकेट म्हणजेच मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय माफीयांशी त्याची दोस्ती असल्याचं बोललं जाऊ लागलं....एलटीटीई च्या लोकांशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा होती.....त्यातच एकदा मुंबईत भर कोर्टात गवळी गॅंगच्या रवींद्र सावंतने पिस्तुलातून त्याच्या मस्तकाचा वेध घेतला.. डोक्यातून गोळी आरपार जाऊनही अश्विन बचावला खरा...पण, कमरेखालचा भाग लुळा झाला...कायमचाच....एकेकाळचा उत्तम क्रिकेटपटू कायमचा अपंग झाला...अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली....अश्विनच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला....सारं काही संपलंच जणू असं वाटू लागलं होतं....त्यानंतर, वैद्यकीय जामिन मिळालेल्या अश्विनला घेऊन अमर विदेशात रवाना झाला...निरनिराळ्या देशांमध्ये त्याच्यावर इलाज केले...पण काही उपयोग झाला नाही...त्यानंतर, अमर भारतात परतला व काही दिवसांतच पोलिसांच्या चकमकीत ठार झाला . .. अश्विनवर आभाळ कोसळलं....त्याचा सर्वात मोठा आधारच संपला...त्या ही संकटातून तो मनाने उभा राहीला.. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ लागला....जगातील बहुतेक देशांमध्ये तो राहीला......विदेशात असतानाच तो माझ्याशी जोडला गेला...त्याच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडल्यानं तो ख-या अर्थाने मला मित्र मानू लागला...आकाश या नावाने त्याच्याशी बोलायचो... काहीजण त्याला डॉक्टर म्हणतात . . .. विदेशातून तो दिल्लीत वास्तव्याला होता काही वर्षं....तिथून पुन्हा विदेशात जाताना बांगलादेशाची सीमा ओलांडत असताना 2000 साली तो पकडला गेला...मग तिहार जेलमध्ये रवानगी....त्याच्याविरूद्धच्या सर्व केसेसची सुनावणी सुरू झाली...दिली, मुंबई आणि पुणे अशा निरनिराळ्या ठिकाणी त्याला खेटे सुरू झाले....मुंबईत कोर्टातच झालेल्य गोळीबाराच्या अनुभवामुळे त्याची प्रत्येक खेप चिंता करायला लावणारी ठरली...त्यातच त्याच्या लाडक्या पत्नीचा नीताचा गोळ्या झाडून खून करण्यात आला...त्याचाही आरोप त्याच्यावरच ठेवण्यात आला...आई गेली...वडील गेले....अमर गेला... जीवाभावाचे कितीतरी दोस्त एकापाठोपाठ गेले....कायमचे अपंगत्व आले . . .पत्नी नीताही गेली.....एकापाठोपाठ एका धक्क्यांतून सावरत असलेल्या अश्विनची सारी जवानी प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यात आणि नंतर खटले लढण्यात गेली . . ..दोन वर्षांपूर्वी सर्वच्या सर्व खटल्यांतून त्याची निर्दोष सुटका झाली....

                             कधीकाळी नाइलाजाने का होईना पण चुकीच्या मार्गाला लागलेला अश्विन पुन्हा एकदा सन्मार्गाच्या वाटेवर आहे....एक कन्स्ट्रक्शन फर्म त्याने सुरू केलीय......दादरमधीलच आफीसमधून त्याचा कारभार चालतो....अंडरवर्ल्डला त्याने रामराम ठोकलाय....वाट चुकलेल्या सहका-यांना निरनिराळे व्यवसाय देऊन मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाय....मागचे कसलेही हिशेब आता उरलेले नाहीत आणि करायचेही नाहीत....दॅट वॉज माय पास्ट.....मला सन्मानाने जगायचंय...असं तो नेहमी म्हणतो आणि तसं जगायचा बहुदा प्रामाणिक प्रयत्नही करतोय...गेल्या आठवड्यातील ठाणे-मुंबईच्या धावत्या दौ-यात त्याची भेट हुकली......खरंतर एरवीही  संपर्क अथवा संवाद क्वचितच होतात. . .. काही गरजच पडत नाही ना....पण एक कायम लक्षात असतं...आहे आपला हा मित्र.....ठिक आहे....होता निराळ्या वळणावर...पण सध्यातर चांगल्या मार्गावर आहे ना! ....मी कधीच हिंसेचं अथवा गुन्हेगारीचं समर्थन करीत नाही आणि कुणाचचं उदात्तीकरण करत नाही....फक्त जे काही अनुभवलं...जे काही जगतो...ते आडपडदा न ठेवता लिहितो एवढंच.....आश्विनचा आज वाढदिवस....अश्विन खूप खूप शुभेच्छा....सन्मार्गावर चालताना अनेक काटे तुला बोचतीलही....पण, त्यानंतर दूरवर हिरवळच हिरवळ पसरलीये.....आणि ही हिरवळ हवी असेल, तर काट्यांकडं दुर्लक्ष कर....सन्मार्गावर चालतोयस ना!...कधीच हा मार्ग सोडू नकोस.....दाखवून देऊ जगाला.....वाल्मिकी या युगातही पैदा होऊ शकतात. . .


Wednesday, 21 November 2018

बोरीचा घोडा आणि चेटूक

बोरीचा घोडा आणि चेटूक
 -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -
      बोरीचा घोडा या पाड्यावर काही जनावरं आकस्मिक दगावली...काही दिवसांनी ते सत्र थांबलं..पण, चेटूक थांबल नव्हतं...तो मोर्चा बालकांकडं वळाला..गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ दोन मुलं दगावली..दोघं सिरीयस आहेत...मुलाबाळांसह लोक पाडे सोडून इतरत्र रहायला जात आहेत...एकाकडून या प्रकाराची माहिती समजली आणि जव्हार, मोखाडा, विक्रमगडच्या मुशाफिरीतून त्या पाड्यावर निघालो..

      जव्हारपासून सिल्व्हासाकडे जाणा-या रस्त्यावर पंचवीस-तीस किलोमीटरवर बोरीचा घोडा हा पाडा आहे. अंतर कमी आहे..पण रस्ता कमालीचा  अरूंद.. खाचखळग्यांचा..नागमोडी वळणांचा.. साध्या मोटारी किंवा जीपचा उपयोगच नाही... दणकट गाड्या हव्यात...चालक कुशल हवा...आमच्याकडे सफारी होती....कांचन पाटीलसारखा उत्तम ड्रायव्हर होता.....जव्हारपासून निघाल्यावर दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाचा जणू शेलाच पसरला होता. गर्द हिरवा, पाचूसारखा हिरवा, पोपटी हिरवा, मखमली हिरवा, बांगड्यांचा हिरवा, हिरवा जर्द, फिकट हिरवा, पिवळसर हिरवा.... हिरवाईच्या इतक्या अद्‌भूत छटा आपल्याकडं अभावानेच पहायला मिळतात. . . न्याहळे गावात डॉ.अनिता पाटील यांचा हेल्थ कॅम्प होता...त्यांना तिथे सोडून आम्ही पुढे निघालो....सुतारपाडा, कापरपाडा, बोरीचा पाडा, सुळ्याचा पाडा असे कितीतरी छोटे पाडे वाटेत दिसले...मातीची...नुस्त्या विटांची किंवा चित्रात दिसतात तशी कुडाची घरं..पोटं खपाटीला गेलेले उघडेवाघडे आदिवासी..कष्टाची कामं करणा-या स्त्रिया, रानात हुंदडणारी, नदीत डुंबणारी मुलं, गुरं राखणारे लोक वाटेत दिसत होते..इकडं एन्टरटेनमेंट काहीच नाही...पण, इथला निसर्ग कमालीचा सुंदर, लोभस आणि शब्दातीत..त्यामुळं लोकांना ओझोनयुक्त ताजी आणि मोकळी हवा भरपूर मिळते...पण दोनवळा खायला काही मिळेलच याची शाश्वती नसते..मिळेल ती भाजी शक्यतो बटाटा, वांगे, कारली, भोपळा, भेंडी किंवा रानभाज्या...नाहीतर सुकट-बोंबिल...नागलीची भाकरी...इथं कांदा, लसूण, आले वगैरे मसाल्याची चैन नाही...

             बोरीचा घोडा अतिशय दुर्गम भागात....बाहुपाडा, शेलकीचा माळ या भागातला....रस्ता नेमका माहित नव्हता...विचारत विचारत पुढे चाललो होतो...वाटेत एक वीस-बावीस वर्षांचा तरूण भेटला...त्याच्या हातात गलोर होती...मस्त...दणकट रबरापासून मन लावून बनवलेली...त्याच्याशी जरा गप्पा मारल्या... योग्य मोबदला देऊन गलोर मला घेऊन टाकली...पुढे वड पाड्यावर एक म्हातारी भेटली...सत्तरीतील पण तरतरीत...कांचनच्या परिचयाची होती...तिला विचारलं बोरीचा घोडा कुठं आहे ?.बरोबर येता का? असं विचारल्यावर ती तयार झाली...मग गाडीत तिला पुढं बसवलं..गप्पा सुरू झाल्या...तिचं नाव ठकी नवशा कोरडा..गावात शेतीवाडी बरी... बाळंतपणात दाईचं काम करते..पंचक्रोशीत त्यासाठी ती सर्वपरीचित...अनेक अडलेल्या बायकांना कसं मोकळं केलं याचे अनेक किस्से तिने सांगितले....डॉक्टर मंडळीही आपल्याला कसं मानतात, शासकीय रुग्णालयात आपण नर्सना कसं प्रशिक्षण देतो, हे ती सांगत होती....आदिवासी पाड्यांवरचं जगणं कसं बिकट आहे? ते सुसह्य होण्यासाठी काय करता येईल? याबाबत ती भरभरून बोलत होती.. तिला बोरीचा घोडा या पाड्यावर होत असलेल्या प्राण्यांच्या, मुलांच्या मृत्यूबद्दल विचारलं...तशी ती सावध झाली...आडून आडून माहिती दिली..पण थेट बोलेना...मला कायच माहिती नाय...असं म्हणायला लागली...

          ठकीबाईशी बोलता बोलता बोरीचा घोडा पाड्यावर आलो...ठकीबाई एकदम सावध झाली...गाडी आत घालू नको....इथंच थांबव म्हणाली...मी ऐकलंच नाही...गाडी जशी पुढं नेली तशी तिची धांदल उडाली...मग पाड्याच्या थोडं अलिकडं गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो..ती गाडीतच बसून राहीली...लोक टकामका पाहत होते...कुणाकंडी न पाहता सरळ पाहत चला असं सांगून मी पुढे निघालो...कपिल आणि कांचन मागाहून येत होते...पाडा छोटासाच.... छत्तीस उंब-याच्या या पाड्यावर जेमतेम दोनशे लोक रहातात . . .कशाबशा कुडाच्या उभारलेल्या झोपड्या...शेळ्या-कोंबड्या इकडून तिकडे पळत होत्या...आपापल्या घराजवळ लोक उभे होते....वातावरण शांत होतं...त्या नीरव शांततेवर शोकाची अन त्याहून अधिक भीतीची गडद छाया  सहजपणाने जाणवत होती...पहिली आठ-दहा घरे ओलांडली.. ...माजी सोन्याची लेकरी...सोन्याची लेकरी.....असा  एका महिलेने फोडलेला हंबरडा आसमंत चिरत गेला...काळजात लककन हललं...त्या घराच्या ओसरीत दोन स्त्रिया  रडत होत्या....आजुबाजुचे लोक सुन्न झाले होते...तिथून पुढं निघालो...गावाच्या सीमेवर कारल्याच्या, भोपळ्याच्या वेलांचा मोठा मांडव होता...पक्ष्यांनी ते खाऊ नये म्हणून भलमोठं बुजगावणंही उभ केलेलं...तिथल्या एका ओंडक्यावर विसावलो... एक किशोरवयीन मुलगा समोरून उत्सुकतेनं पाहत होता..त्याला विचारलं काय झाल? का रडताहेत ते? त्यांचं बाळ मेलं काल..तो म्हणाला...त्याचं नाव काय? तो काहीतरी पुटपुटला..मग म्हणाला मला नाय म्हायीत...वडलांना म्हायती...म्हटलं त्यांना पाठव...तो गेला..त्याचे वडील आले...बाबन चिबडे त्यांचं नाव..अंगात लेंगा..वर बनियन..गळ्यात तुळशीची माळ...कळकट चेहरा आणि त्यावर भय होतं...गुजराती हेलातील त्यांची मराठीमिश्रीत गुजराती आता ब-यापैकी परिचयाची झालीय.. ते बोलू लागले...गणपतीचा सातवा दिवस होता...गावातील एक बैल मेला...दुस-या दिवशी दुसरा...तिस-या दिवशी तिसरा...गावकरी हादरलेच...हा प्रकार समजल्यावर प्रशासकीय अधिकारी तिथं दाखल झाले...त्या गुरांना दिला जाणारा चारा तपासला..इतर शेळ्याकोंबड्यांना प्रतिबंधात्मक औषधं दिली..पण गुरं काही मरायची थांबेनात...एकापाठोपाठ पंधरा बैल गेले..बरं रात्री बरा असलेला बैल सकाळी एकाएकी थरथरायला लागायचा...तोंडातून लाळ गळत रहायची आणि एकाएकी त्याचा जीव जायचा..लोक भयभीत झाले...काहीजण नजिकच्या पाड्यांवर रहायला गेले...डॉक्टरी उपायांनी काही होईना म्हणून लोक भगताला शरण गेले...बाहेरची काही बाधा आहे का? या संशयानं पछाडले गेले...धामणीनजिकच्या पाड्यावरनं भगत बोलावला..त्यानं तांत्रिक विधी केले...मुलांना घेऊन सगळ्या बायकांना पाड्याबाहेर् जायला सांगितलं...तीन दिवस सारे व्यवहार बंद ठेवले होते..बाहेरच्या माणसांना पाडा बंद केला...पाड्याच्या सीमा त्यांनं मंत्र मारून बंद केल्या...देवाला आवाहन केलं....दानवाला शरण गेला..हिरव्या देवाला साकडं घातलं..दोन बोकडांचा बळी दिला...काही पथ्यं सांगितली....पाड्यातली पशुबळी बंद झाले...लोक आश्वस्त झाले...

          आठ-दहा दिवस बरे गेले...आणि एकाएकी पाड्यातली मुलं आजारी पडू लागली.. फारशी काही लक्षणं नाही...जरा ताप..थंडी आणि मुख्य म्हणजे निपचित पडायची...वृषिला नवसू माडी ..ही जेमतेम तीन वर्षाची मुलगी एकाएकी मरण पावली...लोक हादरले...दोन दिवसांनंतर अक्षय भास्कर चिबाडे हा दोन वर्षाचा चिमुरडा देवाघरी गेला...लक्षण तेच...नितीन तुळशीराम वाझे हा चिमुरडा सिरीयस झाला...योगायोगाने जवळच्या पाड्यावर हेल्थ कॅम्प चालू होता...डॉ. अनिता पाटील यांनी प्राथमिक उपाचार करून त्यांनी त्याला तातडीने नाशिकच्या रुग्णालयात हलवलं...त्यापाठोपाठ अजय विष्णू वाझे हे दिड वर्षाचं बाळ आजारी पडलं...त्याला जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं...हे दोघे वाचले....पण पाड्यावर आलेलं हे संकट नेमकं कसलं या विचारानं लोक भयभीत झालेत...भगताच्या उता-याचा काही परीणाम होत नाहीये म्हणून ते हवालदिल झालेत...अलिकडं तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी या मंडळींमध्ये विश्वास निर्माण केलाय..अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न  सुरू आहेत. आरोग्य अधिकारी त्यांच्या टीमसह तेथे पोहोचले...सर्वांना प्रतिबंधक औषधं दिलीत..पाड्यावर कायमची एक नर्स ठेवलीये..त्यामुळं वातावरण शांत आहे....पण भयभीत आहे..कुणीतरी चेटूक केलंय ही त्यांच्या मनावरील भावना काही जाता जाईना..

                      भगतानं गेल्या खेपेला पाड्यावरच्या एका व्यक्तीनं चेटूक केलं असल्याचं गाववाल्यांना सांगितलं होतं...तो एका अंगणवाडी मदतनिसचा पती...त्याला पाड्यावरच्या लोकांनी बोरीच्या झाडाला बांधून मारहाण केलीय...ते दांपत्य गाव सोडून अन्यत्र रहायला गेलेत...आजारी असलेलं एक बाळ आधीच आईसह दुस-या पाड्यावर स्थलांतरीत झालं होतं..पण, तिथंही ते गंभीर आजारी पडलं..त्यमुळं या पाड्यावरच्या लोकांना राहू द्यायला इतर पाड्यावरचे लोक तयार नाहीत...या लोकांचं संकट आपल्यावर येईल अशी भीती त्यांना वाटते....ही दशा त्याच माणसानं केली असावी, असा गाववाल्यांचा वहिम आहे...नेमकं कारण शोधायला दुसरा चांगला भगत कुठे आहे का? याचाही ते शोध घेताहेत....जिल्हा प्रशासन  आरोग्यसेवा देण्याबरोबरच अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही आटोकाट प्रयत्न करताहेत...बाबन चिबडेंचा मी निरोप घेतला...सर्व काही ठिक होईल...काही घाबरू नका म्हणालो...गाडीत बसलो...त्या भागात फोनला रेंजच नाही...मेंढ्याचा पाडा पार करून पुढे आलो आणि एका वळणावर थोडी रेंज आली...फोनवर मेसेज झळकला...'' भारताने सोडलेल्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलाय..इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे यश...देशभर जल्लोष...'' डोळ्यांसमोर सोन्यासारखी लेकरीऽऽऽऽ म्हणत शोक करणारी बयाम्मा उभी राहीली...पाड्यावरचं चेटूक काढण्यासाठी दिलेल्या बोकडांचे निष्प्राण डोळेही उभे राहीले....गार गार वारं सुटलं होतं...डोळ्यात गेलेलं कुसळ काढतानाच कढत अश्रू कधी बाहेर पडले हे समजलंच नाही...

कोवळे दिवस

कोवळे दिवस
........................
लहानपणापासून कॉलनीत रहायचो...अकरा चाळींची होती आमची कॉलनी...प्रत्येक चाळीत चाळीस..पन्नास कुटुंब...फक्त चाळच नव्हे तर आख्खी कॉलनी एक कुटुंब होती...प्रत्येक व्यक्ती निराळी असं गृहीत धरलं तर दीड -दोन हजार जणांच्या तो कुटुंब कबिला होता...त्यामुळं नाना प्रकारच्या मानवी स्वभावांचे कंगोरे जवळून बघता आले...माझ्या पिढीतल्या कित्येकांचं बालपण, पौगंडावस्था, तारुण्य या कॉलनीनं अनुभवलं...इथंच शाळेतले धडे मिळाले अन किशोर वयातली कोवळीक ही इथंच अनुभवली...एरवी जेव्हा कामजीवनाबद्दल कुठं काही वाचनात आलं की कॉलनीतल्या कामजीवनावरही कधीतरी लिहावं असं कायम मनात येतं... कारण इथं खूप निराळे अनुभव मिळाले..पौगंडावस्थेतली मनाची घुसमट, कोवळ्या वयातलं प्रेम अन् लैंगिक भावनांचं दमनही इथं जवळून पाहता आलं .. विकृतीच्या पल्याड असलेल्या इथल्या काही व्यक्ती, घटना मनात कायमच्या रुतल्यात...

चाळीत संडास, बाथरूम, नळ  कॉमन..चौघांनमध्ये एकेक..बाथरूममध्ये तेव्हा पाणी नसायचं...त्यामुळं तिथं काहींनी स्टोअर रूम केलेली.....पण, बहुतेक बाथरूम धूळ खात पडलेली असायची...चाळीतल्या काही नवथर पोरापोरींची ती शृंगाराची ठिकाणं बनली....चाळीतल्या या बाथरुमांनी अनेक पिढ्याचे रोमान्स बघितलेत..तेव्हा कळत नव्हतं किंवा जाणवलं नव्हतं पण आता वाटतं की चाळीतले नळ हे सुद्धा आकर्षणाचं केंद्र असायचं...तिथं पाणी भरायला येणाऱ्या मुली,  महिला, नवविवाहित स्त्रिया यांच्याशी साधला जाणारा संवाद, त्याचे पैलू, विषय याच्या तऱ्हा निरनिराळ्या असायच्या...

                    चाळीत आम्ही लहानाचे मोठे झालो.. सोबतच्या मुलीही मोठया होत होत्या.... वयात येताना मिसरूड फुटणं, आवाज घोगरा होणं, अंगावर कोवळी लव फुटणं हा बदल होत गेला...तसा मुलींच्या अवयवांना गोलाई येत असल्याचं लक्षात येत होतं.. .या वयातले उष्ण श्वास, कुणाकुणाला पाहून होणारी अनामिक हुरहूर कळत होती..नजरेतली प्रतीक्षा उमगायला लागली..छायागीत बघण्याच्या निमित्ताने एकत्र येण्यातही मौज होती..अन्  खेळांच्या, पर्वतीला एकत्र फिरायला जाण्याच्या निमित्तानं एकत्र येण्याला आगळा आयाम प्राप्त झाला होता...'कावळा शिवणं' म्हणजे नेमकं काय हे समजत नव्हतं.. पण ती संज्ञा तेव्हा माहीत झाली..अवयवांबद्दल उत्सुकता दाटण्याचं हेच् वय ..अन अन बाहेर वाळत घातलेल्या अंतर्रवस्त्रांबद्दल कुतूहुल वाटण्याचंही हाच काळ...याच काळात मुलांची भाषा बदलली...शिव्यांमधली झ ची बाराखडी उमगायला लागली..खरंतर त्यावेळी लैंगिक माहिती पुरवणारी व्यवस्था असायला हवी होती..चौकातल्या दुकानात मिळणारी पिवळी पुस्तकं हे अनेकांचं याबाबतचं कुतूहुल शमवण्याचं साधन होतं... गप्पाटप्पांमध्ये मोठी मुलं या माहितीत काहीबाही भर घालायचे..अर्थातच त्याला काही शास्त्रीय गाभा नसायचा..त्यामुळं याबाबतीत नेमकी अधिकृत माहिती पुढं बहुदा अनुभवातनंच् मिळाली..

कॉलनीत तीन तृतीयपंथी होते.खरंतर अडीच..म्हणजे दोघे पूर्ण अन एक अर्धा..त्याला निमगांडु म्हणतात हे कॉलनीतच् समजलं..पुढं हा शब्द अन संज्ञा फार कुठं कानावर आली नाही....म्हणजे असं होतं की तो स्त्रीशी संग करू शकत होता; पण त्याआधी अन्य पुरुषाने त्याच्याशी संबंध ठेवणं ही त्याची गरज होती..ती शारीरिक की मानसिक हे कळायचं ते वय नव्हतं...तर, या अडीचजणांनी कॉलनीतली बरीच पोरं नादाला लावलेली...पूर्ण सज्ञान व्हायच्या आतच् त्यांना वासनेची चटक लावली...अनेक मुलांचं कौमार्य हे कुठल्या स्त्री शी नव्हे,तर या अडीच तृतीयपंथीयांशी संग करण्यात भंग झालं हे एक कटू वास्तव आहे..कॉलनीतल्या एकीला मदनवायू होता...म्हणजे तिच्यात सर्वसाधारण प्रमाणापेक्षा वासनेची तीव्रता खूपच्  जास्त होती..त्याबाबतचे अनेक रसभरीत किस्से अगदी अलीकडपर्यंत  चवीनं चघळले जायचे..खरंतर मदनवायू हा शब्द कुठून आला ? त्याची उत्पत्ती काय ? हे कधी समजलं नाही...पुढेही कधी हा शब्द कानावर आला नाही...खरंतर हे सारे विकृत प्रकार..पण उमलत्या वयात आम्ही ते जवळून पाहिलेत..तसल्या उद्योगांमुळं काहींना गुप्त विकारांचीही बाधा व्हायची..त्याचाही पोरांमध्ये बभ्रा व्हायचा...तसल्या आजारांना व्हेरी डेंजर या अर्थानं व्हीडी असा कोडवर्ड ठरलेला असायचा..स्वारगेटजवळ कुलकर्णी म्हणून एक डॉकटर या उपचारांसाठी ठरलेले  होते....ते त्यासाठी 'डॉक्सी' हे औषध देतात ही माहितीही पोरांकडं असायची...कित्येकदा परस्पर केमिस्टकडं जाऊन ही गोळी घ्यायचे..तो अर्थपूर्ण हसून गोळी द्यायचा..नान्या म्हणून कॉलनीत एकजण रहायचा..चेहऱ्यावरूनच् विकृत भासायचा..त्याची लैंगिक भूक विचित्र होती..प्राण्यांशी संग करण्याची घाणेरडी सवय त्याला होती...समलैंगिक संबंधांचेचं ही बरेच प्रकार तिथं पाहिले..योग्य त्या वयात नेमकी माहिती नसल्यानं करपत असलेली जवानी आजूबाजूला दिसायची...

कॉलनीत काहींना दहा बाय बाराची खोली.... भिंतीला लागूनच शेजारशेजारी घरं....एकंदरच् प्रायव्हसी नावालाही नव्हती..नव्या नवरीची त्यामुळं कुचंबणा व्हायची...पण, तशाच परिस्थितीत तिथं कित्येक पिढयांनी संसार केलेत...एखाद्याकडं नवीन लग्न झालं की पोरांसाठी ती पर्वणी ठरायची... घरांची शटर्स अनेकांचे रोमान्स उघड करायची..अशावेळी भिंतींचे कान अधिक तिखट व्हायचे ...पण, या कॉलनीत फक्त  विकृत चाळेच् पाहिलेत असं आजिबात नाही..कोवळ्या वयात फुललेल्या, काही आयुष्यभर अव्यक्त राहिलेल्या  प्रेमकहाण्या तिथं पाहिल्या...देहात बदल होत असताना शरीरभर फुलणारी पालवी अनुभवली...नवथर प्रेमातले तिरपे, चोरटे कटाक्ष दिले अन झेललेही..प्रेमपत्र लिहिणं म्हणजे काय माहित नसताना इथंच ती लिहिली, छुपे खलिते पाठवले, नजरेची भाषा कळू लागली अन कुठल्याही चित्रपटात नसतील असे प्रेमाचे निसर्गसुंदर आविष्कार अनुभवले..त्यावेळी एकमेकांसाठी मन लावून लिहिलेल्या पत्रामुळंच् अक्षर सुधारत गेलं असावं.. अन् आताच्या लिखाणाचं बीजही बहुदा त्याच लेखनात दडलं असावं असं वाटतं..तिथले काही मित्र आता कथा, कविता लिहितात..त्यामागं ही कॉलनीत पाहिलेल्या,अनुभवलेल्या काही यशस्वी अन बऱ्याच अधुऱ्या कहाण्या असाव्यात असंही जाणवतं.... कॉलनी सोडून वीस वर्षं उलटली...पण, तिथली नाळ काही तुटत नाही..कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तिथल्या घटना आठवत राहतात...मोरपंखी दिवसांच्या स्मृती मन तजेलदार करतात.कोवळ्या वयातले कित्येक क्षण मन हळवं करतात.अन् काही तप्त अनुभव लिहायला उद्युक्त करतात.....