मैत्र
- - -
वयाची पन्नाशी गाठत असताना अजूनही शाळेतला, पार इयत्ता पहिलीचा वर्ग जसाच्या तसा आठवतो.अश्विनीनं तेव्हापासूनची ती मैत्री निर्व्याजपणं जपलीय. नात्यातला निरागसपणा टवटवीत ठेवलाय.
तो वर्ग तसाच डोळ्यापुढं ठेवलाय. 'टप टप पडती अंगावरती फुले..' ही कविता शिकवतानाच्या जोशी बाई आणि इयत्ता चौथीचा शिवाजी मराठा शाळेतला वर्ग अजून लख्ख नजरेसमोर आहे.
कळत नव्हतं इतका लहान असल्यापासून सत्येन सावलीसारखा सोबत आहे. एसके, प्रताप, विजू आहेर, राजू चौरे, सचिन पाटील, अजय दराडे, क्रांती, माधुरी, उल्का,संजू कटारिया असे कितीतरी मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये भेटले. एसपीच्या विस्तीर्ण कॅम्पससारखंच मनही विशाल असलेल्या या मित्रांमुळं तिथल्या प्रत्येक इंचावर काही ना काही आठवणी रेंगाळल्यात. कॉलेजच्या दगडी भिंतींनाही हेवा वाटावा अशी आमच्या दुनियादारीची दास्तान आहे. प्रचंड गदगदून आल्यावर मजबूत खांदा देऊन हे दोस्त मला मोकळं करतात.
आंबिल ओढा कॉलनीतले मित्र आयुष्याचा मोठा हिस्सा आहेत. कसलीही पर्वा न करता अर्ध्या रात्रीत मदतीला धावून येणारे अनिल, पिंट्या,विक्रम, कमलेश,अजित,सतीशसारखे दोस्त सगळ्यांना मिळायला हवेत. त्यांनी जगणं बिनधास्त केलं. कॉलनीचं भक्कम पाठबळ असल्यानं कधी कुणाचं भय वाटलं नाही. प्रॉब्लेम्स फाट्यावर मारून कसं जगायचं हे तिथं नकळत शिकत गेलो.
पत्रकारितेच्या निमित्तानं समाजाच्या बहुतेक सगळ्या,चांगल्या वाईट क्षेत्रातली खूप माणसं भेटत गेली. मुकुंददादा पंडित, अण्णा थोरात, प्रताप परदेशी, उदय जगताप,अजय तायडे, बाळा जगताप ही मंडळी मित्र तर बनली; जगायचा आधारही ठरली. औषधाची गोळी देणारे डॉ. अविनाश भोंडवे, डॉ.कुमार मांढरे, डॉ.गोजीरा, डॉ. शिल्पा छान मित्र झाले, अन बंदुकीची गोळी अधिकृतपणे बाळगणारे राजेंद्र जोशी, राम जाधव, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र जोशी, रेखा साळुंखे,नीलम जाधव,स्मिता जाधव, क्रांती पवार अशा मित्रांनी जगणं समृद्ध केलं.
काश्मीरचा विमलवैना सुंबली, जयपूरचे जुगल प्रजापती, माथेरानचे संतोष पवार, पाचगणीचे सुनील कांबळे, कोल्हापूरची मीना पोतदार, गोव्याचा केदार वझे, सांगलीचे गणेश जोशी अन साताऱ्याचे श्रीकांत कात्रे, मुंबईची दीप्ती, तेजल,थेट भंडाऱ्याच्या मौसमी अशा कितीतरी मंडळींशी किती जुनी मैत्री आहे याचा हिशेब लावणंच चुकीचं आहे. कितीतरी लांबून दादुस अशी निरागस साद देणाऱ्या
विरारच्या रीमाला कसं विसरू शकतो ?
अक्कलकोटला गेल्यावर खूप आपुलकीने थेट स्वामींच्या पुढ्यात उभे करणारे गणेश दिवाणजी, जव्हारसारख्या दुर्गम भागात भेटलेल्या डॉ.अनिता तसंच राजेश आणि दीपाली या तेंडुलकर दाम्पत्यामुळं तिथं कधी परकं वाटलं नाही. त्यांच्या निर्लेप मैत्रीनं तिथं जायची ओढ निर्माण झाली. त्या भागाशी कायमचे बंध जुळले.
विश्वजीत आणि कपिल हे दोघं भेटूनही आता बरीच वर्षे झालीत. दोघे उत्तम फोटोग्राफर आणि जानी दोस्त. आमच्या तिघांचाही जन्म सातारा जिल्ह्यातल्या फलटणचा. एकाच हॉस्पिटलमधल्या, एकाच
वॉर्डमधला. अर्थातच निरनिराळ्या वर्षातला. बहुदा नाळ एकाच जागेवर पुरली असणार, त्यामुळंच मैत्री इतकी गहरी झालीय.
जवळच आहे, मैत्रीही आहे; पण भेटलो नाही अशीही काही नाती आहेत. अस्सल देशमुखी थाटात आब राखून संवाद साधणाऱ्या मीनल जाधव अन् पीएसआय ते सिनियर पीआय असा ज्यांचा प्रवास पाहत आलो त्या वर्षा पाटील यांचीही मैत्री संस्मरणीय आहे. परस्परांना नेहमी पाहत आलोय, पण कधीच कसलाही संवाद नाही. अव्यक्त राहूनही त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात मैत्रीची निकोप भावना दडलीय हे ही अनेकांच्या नजरेतून जाणवतं .
नीलमशी मुलीपेक्षा मैत्रीचं नातं दाट आहे. ती खूप जवळची, घट्ट दोस्त आहे. मल्हार माणूस नाही म्हणून काय झालं ! श्वान जन्म घेतलेला तो एक गोड अन तितकाच हट्टी दोस्त आहे. बाबाजी गुरू आहेत,मार्गदर्शक आहेत; तितकेच हळव्या मनावर फुंकर घालणारे मित्रही आहेत.
No comments:
Post a Comment